‘महारयत अॅग्रो’ कंपनीने कडकनाथ कोंबडी पालनामध्ये जवळपास कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे. याप्रकरणी चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारी १२ वाजता मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समितीच्यावतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी समितीचे निमंत्रक दिग्वीजय पाटील यांनी ही माहिती दिली होती. यावेळी हमाल पंचायत समितीचे नितीन पवार, संतोष नांगरे, अमृतराव शिंत्रे, सुनिल सुर्यवंशी आदि उपस्थित होते.
बेळगावहून काढण्यात आला मोर्चा
कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समितीच्या वतीने ९ डिसेंबर रोजी बेळगावहून मोर्चा काढण्यात आला आहे. तो मोर्चा गुरुवारी पुण्यात दाखल झाला. पत्रकार परिषदेनंतर मार्केटयार्डातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि त्यानंतर मोर्चा मुंबईकडे रवाना झाला आहे.
महारयत कंपनीने राज्यातील सुमारे हजारो शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. याशिवाय कर्नाटक, राजस्थान, पंजाब, तेलंगणा, छत्तीसगड, मध्यप्रदेश अशा विविध ठिकाणावरील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली आहे. या कंपनीसह देशभरात सुमारे १३ कंपन्या कडकनाथ कोंबडीपालनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. त्यासंदर्भात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निवेदन देत कारवाईची मागणी केली होती. मात्र, त्यांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. आता ‘महाआघाडी’चे सरकार सत्तेवर आले आहे. त्यांनीही त्यावर कारवाई करण्यासाठी आणि लक्ष वेधण्यासाठी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यावेळी मुख्यंमंत्र्यांना निवेदन देऊन विविध मागण्या मांडणार आहेत. – दिग्वीजय पाटील
हेही वाचा – BREAKING : अखेर उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर!