भिवंडी लोकसभा क्षेत्रात मागील पाच वर्षात शिवसेना भाजपने एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडलेली नाही. मात्र लोकसभा निवडणुकीत युती झाल्याने दोन्ही पक्षातील पदाधिकार्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यामुळे एकमेकांची मने दुभंगलेल्या युतीच्या नेत्यांचे मनोमिलन करण्याठी भाजपकडून पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींना गळ घातली जात आहे. शिवसेनेचे नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीच शिष्टाई करावी अशी मागणी भाजपच्या गोटातून व्यक्त होत आहे. कल्याण लोकसभा मतदार संघात सेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आहेत. भिवंडीत शिवसेनेने असहकार्य केल्यास, कल्याणातही भाजप असहकाराच्या भूमिकेत आहे. त्यामुळे पुत्रासाठी एकनाथ शिंदे यांना शिष्टाई करावीच लागणार आहे. त्यामुळे शिंदेच्या शिष्टाईनंतर नाराजांची कोंडी फुटणार का ? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.
भिवंडी लोकसभा हा भाजपच्या ताब्यात असून भाजपचे कपिल पाटील हे खासदार आहेत. पक्षीय स्तरावर युती झाली असली तरी, स्थानिक स्तरावर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये अजूनही हेवेदावे सुुरू आहेेेत. भिवंडीत भाजपला एकटे पाडून शिवसेनेने काँग्रेसशी संधान साधीत सत्ता स्थापन केली. त्यामुळे मागील पाच वर्षात राजकीयदृष्टया अनेक घडामोडी झाल्याने शिवसेनेची काँग्रेसशी जवळीक वाढली तर मित्र पक्ष भाजपला शिवसेनेने नेहमीच चार लांब ठेवले. युतीची घोषणा झाल्यानंतर शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख बाळ्यामामा म्हात्रे यांनी खासदार कपिल पाटील यांना जाहीर आव्हान दिले आहे . तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेने कधी काँग्रेसबरोबर तर राष्ट्रवादी बरोबर संधान साधीत भाजपला साईड ट्रॅक केले. त्यामुळे शिवसेना भाजपमधील वाद अधिकच चिघळला असून शिवसेनेच्या उमेदवाराचे काम करणार नसल्याची भूमिकाही कार्यकर्त्यांकडून घेतली केली जात आहे. या मतदारसंघावर शिवसेनेकडून दावा केला. परंतु हा मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला असल्याने खा. पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र शिवसेनेचे बाळ्यामामा म्हात्रे यांनी त्यांच्याविरोधात उघडउघड भूमिका घेतली असून, पाटील विरोधी गटातून त्यांना पाठबळ मिळत आहे. तसेच बदलापूर मुरबाड परिसरातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. खासदार पाटील आणि आमदार किसन कथोरे यांच्या विरोधात रणशिंग फुंकणाया शिवसैनिकांचीही युतीमुळे कोंडी झाली आहे.
कल्याण पश्चिमेचा भागही भिवंडी मतदार संघात मोडतो. मात्र कल्याणातील शिवसेनेचे पदाधिकारीही उघडपणे नाराजी व्यक्ती करीत आहेत. सध्या भिवंडीसह बदलापूर, मुरबाड आणि कल्याण शहरातील शिवसेनेत नाराजीचा सूर व्यक्त होत असून, युतीमुळे ते ही कोंडीत सापडले आहेत. मात्र नाराज शिवसैनिकांचे मन वळविण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. कल्याण लोकसभा मतदार संघात पालकमंत्र्यांचे सुपूत्र डॉ. श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत. त्यामुळे भिवंडीमुळे कल्याणात भाजपची नाराजी वाढू नये, त्याचा फटका पुत्राला बसू नये. यासाठी एकनाथ शिंदे यांनी सावध पावित्रा घेतला असल्याचे सूत्रांकडून समजते.