जेएनयू विद्यार्थी संसदेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमारने भाजप सरकारवर आज जोरदार टीका केली. राफेल डीलमध्ये ६०० कोटींचे विमान १६०० कोटींना कसे झाले? मोदी बाहेरच्या देशातील काळा पैसा आणणार होते, मात्रा आता भ्रष्टाचारी देश सोडून पळत आहेत. देशात काळा पैसा कमी होण्याऐवजी तो वाढत चालला आहे. फक्त व्यवस्थेविरोधात बोलणाऱ्यांवर दबाव आणला जात आहे. राष्ट्रवादी आणि राष्ट्रविरोधी असे टॅग लावून वर्गीकरण केले जात असल्याचे कन्हैया कुमार याने आज सांगितले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृती व्याख्यानासाठी कन्हैया आज मुंबईत आला असताना पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्याने भाजप आणि मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.
पत्रकार परिषदेत बोलताना कन्हैया म्हणाला की, पत्रकारांवर व्यवस्थापनाचा दबाव वाढत चालला आहे.
पत्रकार एखाद्या बातमीची शहानिशा करायला जातो, तेव्हा त्याला काम करू दिले जात नाही. विरोधात बातमी लावली तर जाहीराती मिळत नाहीत. चुकीचे काम करणाऱ्यांच्या विरोधात आवाज उचलणाऱ्यांनाच दोषी ठरविले जात आहे, पैसे घेऊन बातमी लावल्याचा आरोप केला जातो. पत्रकारितेवर अंकुश लावल्यामुळे लोकशाही कमजोर होत असल्याचा आरोप कन्हैयाने यावेळी केला.
सरकारच्या संरक्षणामुळे कुप्रवृत्ती वाढल्या
मी आणि गौरी लंकेश विचारांनी एकमेकांशी जोडले गेलो होतो. म्हणजेच मला आणि गौरी लंकेश यांना विरोध करणारे एकत्र आले असण्याची शक्यता कन्हैयाने वर्तवली. डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्येला ५ वर्ष पूर्ण झाले. आरोपींचे चित्र जाहीर करण्यात आले होते मात्र अटक झाली नव्हती. गौरी लंकेश यांना ज्या लोकांनी शिव्या दिल्या होत्या, त्यांना पंतप्रधान मोदी स्वतः फॉलो करत आहेत. सनातनच्या हस्तकांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त केला गेला. ही स्फोटके कुणाविरोधात वापरली जाणार होती. भारतात ज्या ज्या ठिकाणी काळे फासण्याच्या किंवा दगड फेकीच्या घटना घडत आहे, तिथे तिथे भाजपाचेच लोक असल्याचे समोर आले आहे. सरकारचे संरक्षण लाभल्यामुळेच अशा प्रवृत्ती समाजात वाढत असल्याचा आरोपही कन्हैया कुमार याने केला.
कन्हैया कुमार याने उपस्थित केलेले अन्य काही मुद्दे –
– विरोधात मत मांडणाऱ्यांची गोळ्या घालून हत्या केली जात आहे.
– एकीकडे शेतकरी मरत असताना दुसरीकडे फायदा मात्र विमा कंपन्यांना होत आहे.
– सरकार हिदूत्वांचे राजकारण का करतय? धर्म वाचवण्यासाठी लोकांनी सरकारला निवडूण दिलेले नाही.
– माझे अफजल गुरु सोबत संबंध होते हे सिद्ध होत असेल तर मला अटक का करत नाहीत. जर तुमच्याकडे पुरावे नसतील तर तुम्ही माझी माफी मागा
– मी ३० व्या वर्षात पीएचडी पूर्ण केली
– आपल्या पंतप्रधानानी ४५ व्या वर्षात एम.ए. पूर्ण केले, पण त्यांचे प्रमाणपत्र ते कधीच दाखवत नाहीत.
– माझा आवाज दाबण्यासाठी मला तुरुंगात टाकले गेले. मात्र मी त्यांना घाबरत नाही. कुत्रा जेव्हा आपल्याला चावतो, तेव्हा आपण कुत्र्याला चावत नाही.