घरCORONA UPDATEमुंबईत लॉकडाऊन जुलैपर्यंत राहणार?

मुंबईत लॉकडाऊन जुलैपर्यंत राहणार?

Subscribe

राज्यासह देशात सध्या लॉकडाऊन ४ सुरू असून, देशातील हा लॉकडाऊन ३१ मे पर्यंत घेण्यात आला आहे. मात्र ‘आपलं महानगर’ला खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार मुंबईमध्ये जुलै महिन्यापर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. मुंबईमध्ये लॉकडाऊन असताना देखील रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नसल्यानेच मुंबईतील लॉकडाऊन आणखी वाढवण्याच्या विचारात ठाकरे सरकार आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने तशी तयारी देखील केली असून, पुढील दोन महिन्यांचा मास्टरप्लान देखील राज्य सरकारने तयार केल्याचे समजते. सगळ्यात महत्वाचे राज्यातील कोरोनासाथीचे प्रमाण कमी होण्यास सप्टेंबर महिना उजाडणार असल्याचा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे.

मुंबईची वाढती आकडेवारी ठरतेय डोकेदुखी!

राज्यातील कोरोना बाधित रुग्णांमध्ये मुंबईतील कोरोना रुग्णांची आकडेवारी ही राज्य सरकारचे डोकेदुखी ठरत असून, जून आणि जुलै महिन्यात मुंबईमध्ये रुग्णांची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. त्यातच जर लॉकडाऊन उठवण्याची घाई केल्यास मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण अधिक वाढू शकतात. त्यामुळे जोपर्यत मुंबईमध्ये कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी होत नाही तोपर्यंत मुंबईतील लॉकडाऊन उठणे शक्य नसल्याचे एका मंत्र्याने ‘आपलं महानगर’शी खासगीत बोलताना सांगितले. विशेष बाब म्हणजे मुंबईमध्ये सध्या झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना रुग्ण सापडत असून, यामुळे राज्य सरकारची चिंता वाढत आहे. पावसाळा अवघ्या काही महिन्यांवर आलेला असताना मुंबईमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. त्यातच पावसाळ्यात साथीचे आजार आणि कोरोनाची साथ यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण पडू शकतो. याचमुळे जुलै महिन्यापर्यंत तरी ठाकरे सरकार मुंबईतील लॉकडाऊन उठवण्याच्या तयारीत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

मुंबई वगळता राज्यातील इतर ठिकाणी व्यवहार सुरू करणार

विशेष बाब म्हणजे जरी मुंबईमध्ये लॉकडाऊन कायम ठेवण्याचा विचार राज्य सरकार करत असले तरी देखील जे भाग नॉन रेड झोनमध्ये आहेत तिथे सर्व व्यवहार कायम सुरू ठेवणार असून, या भागामध्ये आणखी उद्योग कसे सुरू करता येतील यासाठी देखील राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. तसेच मुंबईतील कंटेन्मेंट झोन वगळता नॉन कटेन्मेंट झोनमध्ये काही व्यवहार सुरू करण्याचा देखील सरकार विचार करत आहेत.

शाळा सुरू करण्यावरून दोन गट

राज्यात करोनाच्या संकटात शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत. अशात आता १५ जून पासून शाळा सुरु करण्याचा विचार सरकार करत असल्याचे संकेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले होते. महाराष्ट्रात शाळा सुरु झाल्यानंतर आठवड्यातले ४८ तास त्या सुरु ठेवल्या जातील. म्हणजे शनिवार-रविवार अशी सुट्टी देणाऱ्या शाळांना ती मुभा नसेल असे वर्षा गायकवाड यांनी म्हटलं होते. मात्र यावरून ठाकरे सरकारमध्ये दोन गट असल्याचे पहायला मिळत असून, काही नेत्यांनी शाळा सुरू करण्यास विरोध दर्शविला असून, मुंबईमध्ये तर सप्टेंबरपर्यंत शाळा सुरू करता येणार नाहीत असे काही नेत्यांचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -