घरमुंबईकल्याणात राष्ट्रवादीने टाकली नांगी; शिवसेनेची लढाई एकतर्फीच!

कल्याणात राष्ट्रवादीने टाकली नांगी; शिवसेनेची लढाई एकतर्फीच!

Subscribe

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र डॉ. श्रीकांत शिंदे हे महायुतीचे उमेदवार असल्याने पुत्रासाठी पालकमंत्र्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

ठाणे जिल्ह्यातील सर्वात महत्वाचा लोकसभा मतदारसंघ म्हणून “कल्याण” ओळखला जातो. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र डॉ. श्रीकांत शिंदे हे महायुतीचे उमेदवार असल्याने पुत्रासाठी पालकमंत्र्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर दुसरीकडे आघाडीकडून राष्ट्रवादी-काँग्रेसचे बाबाजी पाटील हे रिंगणात आहेत. राष्ट्रवादीने माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्यावर या मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे आजी-माजी पालकमंत्र्याच्या प्रतिष्ठेची लढाई समजली जात आहे. शिवसेना भाजप सरकारवर भूमीपुत्रांची नाराजी असल्याने राष्ट्रवादीला पोषक वातावरण आहे. पण या नाराजीचा फायदा राष्ट्रवादीला उठवता येत नाही. पक्षात प्रचारातही अजून रंग चढलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराने सेनेपुढे नांगी टाकल्याचेच चित्र सध्या तरी दिसून येत असल्याने शिवसेनेची लढाई एकतर्फीच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादीच्या प्रचाराचा रंग अजूनही चढलेला

कळव्यापासून ते अंबरनाथपर्यंतचा परिसर हा या मतदारसंघात मोडतो. कल्याणात एकूण २८ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र खरी लढाई शिंदे आणि पाटील यांच्यात होणार आहे. २९ एप्रिल रोजी निवडणूक होत आहे. निवडणुकीला अवघे दहा दिवस शिल्लक आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या प्रचाराचा रंग अजूनही चढलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यकत्यांमध्ये ताळमेळ नसल्याचे दिसून येतय. राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील हे जाहिरसंभांमध्ये शिवसेनेवर धारदार टीका करत नसल्याने पक्षातील कार्यकर्तेच संशय व्यक्त करताना दिसत आहेत. पाटील हे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक होते, तशी त्यांनी तयारी केल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येते. मात्र अचानक त्यांना लोकसभेच्या निवडणुकीची लॉटरी लागली आहे. लोकसभा निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा नव्हती अशीही चर्चा आहे. त्यामुळे प्रचारात अधिक रस घेत नसल्याचे बोललं जात आहे. पाटील यांच्या कोकण किंग या हॉटेलमधूनच प्रचाराची रणनिती आखली जात आहे. हॉटेल समोरच पक्षाचे मुख्य प्रचार कार्यालय थाटलं आहे. प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाला ४० ते ५० च्या आसपास कार्यकर्ते आणि महिला आघाडीच्या अवघ्या तीनच महिला कार्यकर्त्या हजर होत्या. यावरूनच राष्ट्रवादीचे ढिसाळ नियोजन स्पष्ट होत आहे.

- Advertisement -

संमिश्र मतदारसंघ म्हणूनच ओळखला

कल्याण लोकसभेत मराठा, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, मुस्लिम, मारवाडी आणि गुजराती समाज आहे. तसेच स्थानिक भूमीपुत्र, आरएसएस, हिंदुत्ववादी संघटना यांचाही समावेश मतदार संघात आहे. त्यामुळे संमिश्र मतदारसंघ म्हणूनच ओळखला जातो. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जाहिरसभा घेऊन भाजपवर प्रहार करत आहेत. मात्र कल्याणात मनसेला बरोबर घेण्यात राष्ट्रवादी अपयशी ठरल्याचे दिसून येते. कल्याणातील २७ गावे आणि नवी मुंबईतील१४ गावांचा परिसर या मतदार संघात येतो. येथील आगरी कोळी भूमीपुत्रांचा सरकारवर रोष आहे. आगरी समाजाची एक गठ्ठा मते आहेत. पण मात्र त्याचाही लाभ राष्ट्रवादीच्या उमेदवाराला उचलता आलेला नाही. शिंदे यांनी ग्रामीण भागापेक्षा शहराभागाकडे अधिक लक्ष केंद्रीत केलं आहे. पालकमंत्री शिंदे यांनी मुलासाठी आपली ताकद पणाला लावली आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात कमी मतदान झाल्यास माझयाशी गाठ आहे, असा दमही सेनेच्या नगरसेवकांना भरल्याचे समजते. त्यामुळे सेनेचे नगरसेवक कामाला लागले आहेत. राष्ट्रवादीपेक्षाही अधिक वेगाने प्रचार सभा, चौकसभा आणि रॅलीचा धडका सुरू आहे. त्यामानाने राष्ट्रवादीचा प्रचार संथगतीने सुरू आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात प्रचारातील प्रचारात कोण बाजी मारतो याकडं सर्वांच लक्ष वेधलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -