घरलोकसभा २०१९ग्राउंड रिपोर्टइंजिन धावायला लागल्याने वाघ चिंतेत

इंजिन धावायला लागल्याने वाघ चिंतेत

Subscribe

दोन दिग्गजांमध्ये रंगणार काटे कि टक्कर

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता अंतिम टप्पात आली असून मुंबईत २९ एप्रिलला होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी प्रचाराचा ज्वर वाढत चालला आहे. एकेकाळी केंद्रिय मंत्री मंडळात स्थान पटकाविलेले मिलिंद देवरा आणि दुसरीकडे शिवसेनेचे सध्याचे खासदार अरविंद सावंत या दिग्गज आमने सामने असल्याने या मतदारसंघाला एक वेगळे असे महत्व प्राप्त झाले आहे. हे दोन्ही दिग्गज नेते या मतदारसंघात नशीब अजामविणार असले तरी मुंबईसह सर्वांचे लक्ष मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भूमिकेकडे लागून राहिले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेचा शुभारंभ याच मतदारसंघात केला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या बालेकिल्ला मानल्या जाणार्‍या काळाचौकी, डिलाईड रोड आणि वरळी येथील अनेकांनी विरोधी भूमिका घेतल्याने शिवसेनेने देखील आपल्या तयारीचा वेग वाढविला आहे. त्यामुळेच का होईना दक्षिण मुंबईत थेट आदित्य ठाकरे मैदानात उतरुन त्यांनी प्रचाराची बॅट देखील हाती घेत जोरदार शक्तीप्रदर्शन देखील केले आहे.

- Advertisement -

मुंबईतील प्रमुख मतदारसंघापैकी एक म्हणून दक्षिण मुंबई हा मतदारसंघ मानला जातो. या मतदारसंघातून इतिहास लक्षात घेता केंद्रीय मंत्रीमंडळात अनेक मंत्री हे याच मतदारसंघातून गेले असल्याने देशाचे लक्ष या मतदारसंघाकडे लागून राहिले आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही उमेदवारांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या सिलसिला सुरु झाला आहे. त्यामुळे येथील राजकारण तापू लागले असून प्रचारात देखील रंगत आली असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसून आले आहे.

#Live : मुंबईत राज ठाकरेंची जाहीर सभा, मुंबईकरांना कोणते व्हिडिओ दाखवणार?

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 23, 2019

- Advertisement -

 

एकंदिरत येथील सामना हा शिवसेनेसाठी महत्वपूर्ण मानला जात आहे. गिरगाव, लालबाग, परळ, प्रभादेवी, भायखळा आणि वरळी यासारख्या शिवसेनेचा बालेकिल्ला याच मतदारसंघात असल्याने सर्व शिवसैनिक विजयासाठी मैदानात उतरले आहेत.

परंतु या बालेकिल्ल्यातच गेल्या काही दिवसांपासून काही महत्वपूर्ण प्रकल्प रखडल्याने येथील नागरिकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली असल्याने त्याचा दगा फटका बसू नये यासाठी सेनेच्या नेते मंडळीकडून जोरदार प्रयत्न सुरु झालेले आहेत. काळाचौकी येथील जिजामाता नगर येथील रहिवाशांच्या पाणी प्रश्न पेटल्याने येथील रहिवाशांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करतानाच थेट महापौर निवासाचे दार ठोठावले होते.

मात्र त्यानंतरही अद्याप हा प्रश्न न सुटल्याने शिवसेनेचे पालिकेतील अनेक बड्या नेत्यांची दमछाक सुरु असल्याचे चित्र मतदारसंघात दिसून आली आहे. हे प्रकरण शांत होतोच तोच ना.म.जोशी मार्गावरील बीडीडी चाळीतील रहिवाशांनी आणि वरळी येथील कोळीवाड्यातील रहिवाशांनी कोस्टल रोडविरोधात बंड पुकारल्याने सेनेच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले असून याचा फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महाआघाडीचे उमेदवार मिलिंद देवरा यांना संधी देण्यात आली आहे. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीतून मार्ग काढत देवरा यांच्या गळ्यात राहुल गांधी यांनी मुंबई अध्यक्ष पदाची माळ टाकल्याने त्यांच्यासाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची बनली आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये म्हणावे तसे मनोमिलन न झाल्याने त्यांना देखील मतदारसंघ पिंजून काढण्यासाठी चांगलीच दमछाक करावी लागत असल्याचे चित्र मतदारसंघात दिसून आले आहे.

मुळात या मतदारसंघात गेल्यावेळीची आकडेवारी लक्षात घेतली तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उसळलेल्या मोदी लाटेचा फायदा शिवसेनेच्या अरविंद सावंत यांना झाला होता. पण यंदा मोदी लाट नसल्याने महायुतीसाठी यंदाचा पेपर सोप्पा नाही, हे मात्र नक्की. एकंदरितच या मतदारसंघात एकूण सहा आमदार आहेत. ज्यात महायुतीचे एकूण चार तर एक काँग्रेसचे आणि एक एमआयएमचा आमदार आहेत. त्यामुळे तुल्यबळ लक्षात घेता त्याचा फायदा महायुतीच्या उमेदवारांना होणे अपेक्षित आहे, परंतु सध्याचा प्रचाराचा आढावा घेतल्यास यंदा ही निवडणुक जास्त चुरशीचे होईल, असे चित्र मतदारसंघात दिसून येत आहे. पण या मतदारसंघात सगळ्यांचे लक्ष हे एमआयएम आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मतांकडे लागुन राहिले आहे.

या मतदारसंघात गेल्यावर्षी महायुतीचे उमेदवार अरविंद सावंत हे तब्बल १ लाख २८ हजार ५६४ मतांनी निवडून आले होते. त्यांचे हे मताधिक जास्त होते. परंतु त्यांच्या चिंतेत यंदा मनसेच्या सहभागाने नव्याने भर पडली आहे. गेल्यावर्षी प्रत्यक्षात निवडणुकीत उतरलेली मनसे यंदा निवडणुकीत उतरलेले नाही. मनसेच्या नेत्यांनी याठिकाणी काँग्रेसचा प्रचार करण्यास देखील सुरुवात केला आहे. त्यामुळे गेल्यावर्षी मनसेच्या पारडयातील ८४ हजार मते जर काँग्रेसच्या पारड्यात पडली तर त्याचा थेट फटका शिवसेनेला बसणार आहे. त्यामुळे मनसेची ही मते महायुतीच्या पारड्यात पाडण्यासाठी सध्या शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न मतदारसंघात केला जात आहे.

इतकेच नव्हे तर गेल्यावर्षी पहिल्यांदाच निवडणुकीत उतरुन आप या पक्षाने काँग्रेसला जोरदार झटका दिला होता. पण यंदा आप काँग्रेसच्या बाजूने असल्याने ही आपची गेल्यावर्षीची ४० हजार मते सावतांना यांना महागात पडू शकणार आहे. त्यामुळेच का होईना अरविंद सावंत यांनी गेल्या काही दिवसांपासून प्रचाराचा वेग वाढविल्याचे चित्र दिसून आले आहे.

मुळात या मतदारसंघात पारंपारिक शिवसेनेचा मतदार मोठया संख्येने आहे. परंतु विधानसभेत ज्याप्रमाणे एमआयएमने गेल्या विधानसभा निवडणुकीत दिलेली टक्कर लक्षात घेता, सेना ताक ही फुंकून पित असल्याचे चित्र सध्या मतदासंघात दिसून येत आहे. तर शिवसेनेचा एक गट सध्या मनसेच्या मतदारांना आपल्याकडे खेचून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असल्याची माहिती सूत्रांकडून समजते. मुळात शिवसेनेकडून मनसेकडे गेलेला हा मतदारवर्ग काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मतदार करेल, याची शाश्वती नसल्याने अश मतदारांना आपल्याकडे खेचून आणण्यासाठी शिवसेनेच्या मधल्या फळीतील नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेचा गनिमीकावा काम करेल या याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -