मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल असं वक्तव्य सभागृहाबाहेर केलं. मात्र, आता आरक्षणाचा अहवाल आला असून तो ताबडतोब सभागृहात ठेवावा, अशी मागणी ज्येष्ठ नेते आणि शेकापचे आमदार गणपतराव देशमुख यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सभागृहाबाहेर घोषणा करण्यापेक्षा या संबंधीचं विधेयक सभागृहात ठेवावं याबाबत कुणाचही दुमत नाही. सध्याच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जावे, अशी मागणी देशमुख यांनी यावेळी केली. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुनच चर्चेला सुरूवात झाली. विधानसभा विरोधपक्ष नेते राधाकृष्ण विखेपाटील, आमदार अजित पवार यांच्यापाठोपाठ आमदार गणपत देशमुख यांनीही मराठा आरक्षणाबाबत सरकारला जाब विचारला. याविषयावर बोलताना ‘मुख्यमंत्र्यांनी केवळ बाहेर घोषणा न करता, सभागृहात विधेयक आणावे’ अशी मागणीही देशमुख यांनी केली.
वाचा: राजदंड शोभेची वस्तु होऊन बसली आहे – आव्हाड
धनगर समाजालाही आरक्षण द्या
यावेळी बोलताना देशमुख म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावं पण हे आरक्षण घटनेशी सुसंगत दिलं जावं अशी सभागृहाची मागणी आहे. तसंच मराठा समाजासह धनगर समाजालाही आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आगे. धनगर समाजाची गेल्या अनेक दिवसांपासूनची ही मागणी आहे. मुख्यमंत्र्यांनी बारामतीला आल्यानंतर धनगर समाजाला आरक्षण देणार असल्याची घोषणा केली होती. आता, धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचाही अहवाल आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजालाही लवकरात लवकर आरक्षण द्यावे, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.