सध्या महाराष्ट्र राज्यात असलेल्या राजकीय परिस्थितीसंदर्भात जो काही पेच प्रसंग निर्माण झाला आहे. त्यावर अखेर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तोडगा काढला आहे. राज्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण देण्यात आल्यानंतर यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘भाजपाने जर नकार दिला तर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आघाडीला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण द्यायला हवे’, असे वक्तव्य यावेळी जयंत पाटील यांनी केले आहे.
Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari has invited the single largest party BJP to form the government pic.twitter.com/VnIXuzjr22
— ANI (@ANI) November 9, 2019
भाजपाची पाऊलं काय असणार?; साऱ्यांचे लक्ष
१०५ जागा मिळवून राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपा पक्षाला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आमंत्रण दिले आहे. मात्र आता भाजपाची पुढील पाऊलं काय असणार? तसेच त्याच्या पक्षाच्या नेमक्या हालचाली काय असणार? याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
…तर इतर पक्षांचा राज्यपाल विचार करू शकतात
आता भाजपला सत्तास्थापनेसाठी संख्याबळ सिद्ध करावे लागणार आहे. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी आघाडी अस्तित्वात येण्याची शक्याता वर्तवली जात असताना राज्यपालांनी पहिल्यांदा भाजपला निमंत्रण दिले आहे. जर भाजप संख्याबळ सिद्ध करण्यात अपयशी ठरला, तर इतर पक्षांचा राज्यपाल विचार करू शकतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपच्याच नेतृत्वात सरकार स्थापन होणार असल्याचा पुनरुच्चार केला होता. अखेर भाजपलाच राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं आहे.