शिवसेनेत दाखल झालेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत यांच्या गेल्याकाही दिवसांपासून राजकीय मुद्दांवरुन आरोप प्रत्यारोपांची खैरात सुरु आहे. यातच उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ऑफिससाठी नवी जागा विकत घेतल्याचं समोर आलं होतं. कंगनानं त्याच मुद्द्यावर उर्मिला मातोंडकरांना लक्ष्य केलं आहे. कंगनाच्या याच ट्विटवर बोट ठेवत काँग्रेसनं भाजपावरही निशाणा साधला आहे.
BJP ko khush karke…..
महाराष्ट्राची, मुंबई पोलीसांची बदनामी ही भाजपा ला खुश करण्यासाठी होती. @BJP4Maharashtra या कटाची सूत्रधार होती याचा हा कबूलनामा आहे. भाजपाने नाक घासून महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली तरी या पापातून मुक्ती मिळणार नाही. जाहीर निषेध! pic.twitter.com/2F2Py3YfaT— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) January 3, 2021
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने आपल्या ट्वीटमधून आतापर्यंत केलेले कारनामे भारतीय जनता पक्षाला खुश करण्यासाठीच होते, असा कबुली जबाब दिलेला आहे. “सच मे भाजपा को खुश करके” या तिने वापरलेल्या शब्दांमधून तिला भारतीय जनता पक्षानेच महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारी दिली होती असां आरोप करत भारतीय जनता पक्षाने लिहिलेल्या पटकथेनुसारच ती महाराष्ट्राची बदनामी करत होती, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. महाराष्ट्रद्रोही भाजपचे षडयंत्र उघड झाले असल्याची घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
सुशांत सिंग प्रकरणात कंगनाने घेतलेली भूमिका आणि बॉलिवूडमधील ड्रग्स माफियांबद्दल तिच्याकडे खूप माहिती आहे, असा तिने आणलेला आव हा भाजपच्या इशा-यावरच होता. अद्यापही तिने एनसीबीला कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु जनतेच्या पैशातून भाजपने तिला वाय दर्जाची सुरक्षा द्यायला लावली आहे. भाजप आमदार राम कदम यांनी तर कंगनाला झाशीची राणी म्हटले. यावरून तिला भाजपचे राजकीय संरक्षण देखील प्राप्त होते, हे उघड झाले. अशीही टीका सचिन सावंत यांनी केली.
तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरबरोबर केली. मुंबई पोलिसांना माफिया म्हटले. महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाहीत असे म्हटले. ती एवढ्यावरच थांबली नाही, तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करून अपमान केला. कंगना दररोज महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेचा अपमान करत असताना भारतीय जनता पक्षाचे नेते खुश होत होते. यातूनच त्यांचा महाराष्ट्रद्रोह स्पष्ट झाला, असे सावंत म्हणाले. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या प्रगल्भ राजकीय परंपरेला लागलेला कलंक आहे. काँग्रेस पक्ष भाजपच्या या कुटील कारस्थानाचा तीव्र निषेध करत असून राज्यातील जनता भाजपच्या या महाराष्ट्रद्रोहाला कदापी माफ करणार नाही अशीही टीका त्यांनी यावेळी भाजपावर केली.
हेही वाचा – औरंगाबाद महापालिकेची सत्ता मिळताच पहिल्याच दिवशी संभाजीनगर नामकरण करू – चंद्रकांत पाटील