घरमुंबईमहाविकास आघाडी नामांतराच्या मुद्द्यावर चर्चेतून मार्ग काढणार - अजित पवार

महाविकास आघाडी नामांतराच्या मुद्द्यावर चर्चेतून मार्ग काढणार – अजित पवार

Subscribe

औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतराच्या विषयावर महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद नाही, असा खुलासा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. मी स्वतःही डीजीआयपीआरबाबतची ही बातमी वाचली आहे. महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमावर कार्यरत आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांमध्ये चर्चा करून या विषयावर मार्ग काढणार असल्याचे अजितदादा यांनी स्पष्ट केले. औरंगाबादसोबतच अहमदनगर, पुणे यांच्या नामकरणाची मागणीही पुढे येत आहे. त्यामुळे कुणी काय मागणी करावी हा ज्याचा त्याचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी नामांतराच्या मुद्द्यावर आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली.

नामकरणाच्या मुद्द्याच्या निमित्ताने कुणी भावनिक मुद्दे आणते, कुणी विकासाचे मुद्दे काढते. ज्यावेळी १९६० राज्याची निर्मिती झाली तेव्हापासून आतापर्यंत ६० वर्षे पुर्ण झाली आहेत. अनेक नामांतराच्या मुद्द्यावर मागण्या पुढे येत असतात. याआधीही अनेक ठिकाणी विमानतळांची नावे ही आघाडी सरकारच्या काळात बदलण्यात आली. इतर राज्यांपैकी मायावतींच्या सरकारच्या काळातही नावे बदलण्यात आली. लोकशाहीत निवडणून येतात त्यांना आपल मत मांडण्याचा अधिकार असतो असेही ते म्हणाले. मेट्रोच्या कारशेडच्या मुद्द्यावर नक्कीच मार्ग काढू असेही ते यावेळी म्हणाले. कांजुरच्या जागेबाबत शहानिशा करूनच निर्णय घेणार, ज्यामुळे सरकारलाही या निर्णयाचा फायदा होईल असे ते म्हणाले.

- Advertisement -

ईडीला चौकशीचा अधिकार 

आघाडी सरकारच्या याआधीच्या काळातील कागदपत्रे ही अंमलबजावणी संचलनालय (ईडी)ने कागदपत्रे मागवली आहेत. चौकशी करणाऱ्या कोणत्याही संस्थेला कागदपत्रे मागावी याचा अधिकार आहे. ही कागदपत्रे सादर करणे ही जबाबदारी राज्य सरकारच्या विभागाची आहे. सध्या राज्याच्या कृषीमंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळेच त्यांनाही विचारणार होतो की इडीच्या चौकशीबाबत काय झाले ? पण आता संबंधित सचिवांना विचारणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महापालिका निवडणुकांचा निर्णय शरद पवारांचा

महाविकास आघाडी आगामी महापालिका निवडणुकांमध्ये एकत्रित लढणार का ? याचा निर्णय राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार हेच निर्णय घेतील. त्यासोबतच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि नवाब मलिक यांच्याशी चर्चा करूनच याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल. नुकत्याच झालेल्या पदवीधर शिक्षक मतदारसंघ निवडणुका, पोटनिवडणुका तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकात तिन्ही पक्षांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी चांगली कामगिरी केली आहे. महापालिका निवडणुकांना कसे सामोरे जायचे याबाबतचा निर्णय आगामी कालावधीत होईल असे ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -