नारळी पौर्णिमेनिमित्त डोंबिवलीत नारळ फोडी आणि चोर गोविंदा साजरा करण्यात आला. नारळ फोडीत महापौर विनिता राणे यांनी ही सहभाग घेतला होता. गेल्या १५ वर्षांपासून सर्व कोकणवासीय एकत्रित राजकीय जोडे बाजूला ठेवीत हा उत्सव साजरा करतात. अखिल कोकण महासंघाच्या पुढाकाराने डोंबिवलीत नारळी पौर्णिमेला नारळ लढविण्याचा खेळ खेळला जातो. यात हातात नारळ घेत दोघे एकमेकांच्या हातातील नारळावर प्रहार करतात. नारळ फोडून नारळी पौर्णिमा सण साजरा करतात. यावेळी डोंबिवली खाडीत नारळ अर्पण करण्यात आला.
गेल्या अनेक वर्षांपासून रंगणारा हा खेळ कोकणी बांधवांनी डोंबिवलीतही सुरू केला. यावेळी केडीएमसीच्या महापौर विनिता राणे, महासंघाचे अध्यक्ष दिलीप कुडाळकर, माजी नगरसेवक नंदकुमार धुळे-मालवणकर, संकेत चव्हाण, विद्याधर दळवी आदी पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी खेळाचा आनंद लुटला. सुमारे ५०० नारळ फोडण्यात आले.
त्यानंतर रात्री चोर गोविंदा साजरा करण्यात आला. नारळी पौर्णिमेनंतर गोपाळ काल्यासाठी दहीहंडी पथकाचा सराव झाला आहे का? याची चाचपणी करण्यासाठी रंगणाऱ्या खेळाला चोर गोविंदा म्हणतात. यासाठी सुमारे ६० पथकांनी हजेरी लावल्याची माहिती माजी नगरसेवक धुळे यांनी दिली.