म्हाडातर्फे मुंबई-ठाण्यात परवडणाऱ्या दरातील घरं उभारणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. म्हाडा मुंबईतील मोकळ्या जागा खरेदी करुन त्याजागी परवडणाऱ्या दरात घरं उभारणार असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तर मुंबईत आपल्या स्वत:चे हक्काचे घर असावे, असं प्रत्येकाचं स्वप्न असते. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करणार असल्याचे देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले. जितेंद्र आव्हाडांनी आज मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात जनता दरबार घेतला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
आदरणीय पवार साहेबांच्या सूचनेनुसार, दर सोमवारी दुपारी 2 ते 4 या वेळेत मी मायबाप जनतेला भेटण्यासाठी,पक्षाच्या बेलार्ड इस्टेट,फोर्ट येथील कार्यालयात थेट उपलब्ध असतो.आजचा दुसरा सोमवार आहे.
सर्वसामान्य जनतेचे प्रश्न थेट सोडवता येतात,यासारखे दुसरं समाधान नाही. pic.twitter.com/Bwj3qYcHMw— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 14, 2020
दरम्यान, पूर्व उपनगरातील टागोर आणि कन्नमवार नगर या भागात मोठ्या वसाहती उभारण्याच्या तयारीत असल्याचे गृहनिर्माण मंत्री यांनी सांगितले, यासंदर्भात जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्याशी चर्चा करणार असून मुंबई उपनगरात रिकामे असलेले भूखंड ताब्यात घेणार आहे. तर मुंबईत जे रिक्त भूखंड आहेत, त्याबाबतचे वाद न्यायप्रविष्ठ आहेत. अशा वाद असलेल्या जमिनी ताब्यात घेऊन परवडणारी घरे बांधता येतील, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
मुंबई उपनगरात रिकामे असलेले भूखंड ताब्यात घेतल्याने सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरातील घर/सदनिका उपलब्ध करुन देता येतील. म्हाडाने ३० ते ४० वर्षापूर्वी कन्नमवार नगरसारख्या भागात म्हाडाच्या गांधीनगर, मोतीलाल नगर यासारख्या ५६ वसाहती उभ्या केल्या असल्याचेही आव्हाड म्हणाले.