मॅनहोलमध्ये गुदमरून तीन कामगारांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी संबंधित एमआयडीसी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी पोलिसांकडे केली आहे. घरत यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र वाडेकर यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन सादर केले.
जाणून घ्या सर्व प्रकरण – डोंबिवलीत मॅनहोलमध्ये पडून तिघांचा मृत्यू
खंबाळपाडा भागात शुक्रवारी रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या चेंबरमध्ये गुदमरून तीन कंत्राटी सफाई कामगारांचा मृत्यू झाला होता. मात्र मॅनहोलमध्ये रासायनिक सांडपाण्यामुळे निर्माण झालेला घटक विषारी गॅस असल्याचा अंदाज असतानाही सफाई कामगारांना मास्क, सेफ्टी बेल्ट, हार्नेस अशी सुरक्षात्मक साधने पुरवण्यात आली नव्हती, असा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. यामुळेच या तीन कामगारांच्या मृत्यूला एमआयडीसी अधिकारी आणि कंत्राटदार जबाबदार असल्याचा दावा करत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची लेखी मागणीही मनसेने केली आहे.
एमआयडीसी अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत
डोंबिवली पूर्वेतील खंबाळपाडा येथे रस्त्यालगत असलेल्या नाल्याची साफसफाई करत असताना मॅनहोलमध्ये तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. देविदास पाजगे (३०), महादेव झोपे (३८) आणि चंद्रभान झोपे अशी मृत कामगारांची नावे आहेत. तिघांच्याही मृत्यूनंतर पोलिसांनी हद्दीचा वाद रंगवत तक्रार दाखल करुन घेतली नव्हती. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये काही काळ संतापाची लाट पसरली होती. मॅनहोलमध्ये काम करताना एमआयडीसीच्या कंत्राटदाराने योग्य ती काळजी घ्यायला हवी होती. तसेच एमआयडीसीचे अधिकारी, कंत्राटदार, सुपरव्हायझर या ठिकाणी हजर राहणे गरजेचे होते. मात्र निष्काळजीपणामुळेच तीन कामगारांना आपला नाहक जीव गमवावा लागला होता.