राज ठाकरे यांनी या १३ वर्षांत अनेकांना मोठं केलं. मान प्रतिष्ठा दिली. मात्र राज ठाकरे ज्यांना मोठे करतात ते बेईमान का होतात? अशी घणाघाती टीका मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिलेल्या नेत्यांवर नाव न घेता केली. एवढेच नाही तर ज्याला ज्याला साहेबांनी मोठे केले तो साहेबांवर टीका करून जातो हे मला अजूनही कळू शकलेले नाही असे देखील नांदगावकर म्हणाले. मनसेच्या महाअधिवेशनादरम्यान बाळा नांदगावकर यांनी आपल्या भाषणात मनसेची साथ सोडलेल्या नेत्यांवर टीका केली. विशेष म्हणजे नांदगावकर यांनी त्यावेळी जर जर आपल्या १३ आमदारांनी ग्रामीण भाग पिंजून काढला असता तर आज मनसेचे ‘नव निर्माण’ झाले असते, असे देखील नांदगावकर यावेळी म्हणाले.
‘आमच्याकडे राज निष्ठा आहे’
दरम्यान, यावेळी बाळा नांदगावकर यांनी शिवसेनेवर टीका करताना आज सत्तेसाठी सर्व चाललेले असल्याचे म्हणत आम्हाला सत्ता नको आणि पद ही नको. आमच्याकडे राजनिष्ठा हे पद आहे, तेवढंच पुरे, असं म्हणत बाळा नांदगावकर यांनी शिवसेनेवर टीका केली. दरम्यान, यावेळी कार्यकर्त्यांनी कामाला लागले पाहिजे असे सांगत आता हा नव निर्माणाचा झेंडा फडकवूया, असे आवाहन बाळा नांदगावकर यांनी केले.