डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज दादर येथील चैत्यभूमीवर जनसागर लोटला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फेसबुक पोस्ट करत त्यांना अभिवादन केले आहे. फेसबुक पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी आज भारतात लोकशाहीचा कसोटीचा काळ असल्याचे म्हटले आहे. लोकशाही मार्गाने चालणाऱ्या आपल्या भारत देशात सत्तेचं गणित जुळवण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करावा लागत आहे. त्यामुळे सद्य परिस्थिती लोकशाहीसाठी कसोटीची ठरत असल्याचे राज ठाकरे यांना फेसबुक पोस्टमधून सुचवायचे आहे का? अशीच चर्चा रंगण्याची शक्यता आहे.
काय म्हटले राज ठाकरेंनी?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट करत त्यांना अभिवादन केले. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, “स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या मूल्यांची गुंफण करत भारतीय लोकशाहीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचं अभेद्य कवच दिलं. आज भारतीय लोकशाहीचा कसोटीचा काळ आहे. ह्या काळात बाबासाहेबांनी दिलेल्या मूल्यांसाठी आग्रही राहणं हीच बाबासाहेबांच्या स्मृतीस योग्य अभिवादन ठरेल.”