छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ पादचारी पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर विविध पक्षाच्या नेत्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर नेतेमंडळींचे पुन्हा आरोपप्रत्यारोप सुरु झाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवर हॅण्डलवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यावर निशाना साधला. ‘नेहमीप्रमाणे रेल्वेमंत्री ट्विटरवरुन चौकशीचे आदेश कसे दिलेत ह्याची टिमकी वाजवतील आणि जबाबदारी झटकतील आणि मुंबईकर यात भरडले जात राहतील’, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
‘अपघातग्रस्तांच्या आणि नातेवाईकांच्या दु:खात सामील’
राज ठाकरे यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘ही घटना दुर्देवी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अपघातग्रस्तांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या दु:खात सामील आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू.’
#MumbaiBridgeCollapse pic.twitter.com/3HBJNooJST
— Raj Thackeray (@RajThackeray) March 14, 2019