महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवावर यंदा कोरोनाचं सावट आलं आहे. मुंबई शहरातील सर्वात श्रीमंत गणपती मंडळांपैकी वडाळा येथील सारस्वत ब्राह्मण मंडळासह सर्व गणेशोत्सव समितीकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मोठा निर्णय घेतला आहे. यावेळी यंदाचा गणेशोत्सव फेब्रुवारी २०२१ पर्यंत स्थगित करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
Mumbai: GSB Sarvajanik Ganeshotsav Samiti, Wadala has postponed its Ganesh Chaturthi celebrations to February 2021, due to the COVID19 pandemic.#Maharashtra
— ANI (@ANI) May 26, 2020
विशेष म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कोरोना संसर्गामुळे आगामी गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा न करण्याच्या पुण्यातील गणेशोत्सव मंडळाच्या या निर्णयाचे स्वागत केले. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई व राज्यातील इतर भागातील मंडळेही असाच निर्णय नक्की घेतील, असा विश्वास देखील उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केला होता.
दरम्यान, महाराष्ट्रात दरवर्षी साजरा होणारा गणेशोत्सव हा येथील महत्त्वाचा उत्सव मानला जातो. गणपती बाप्पा प्रत्येक घरात दहा दिवस विराजमान होत असतात तसेच सर्वत्र सार्वजनिक मंडळात देखील गणपती बाप्पा बसवून सगळे एकत्र येऊन हा आनंदाचा उत्सव साजरा करत असतात.
यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने होणार साजरा
महाराष्ट्रात मुंबईसह पुण्यात सर्वाधिक कोरोना संसर्गग्रस्त लोक आढळून येत आहे. तर पुणे शहराने नेहमीच सामाजिक चळवळींचे नेतृत्व केले असून समाजाला योग्य दिशा दिली आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत मंडळांच्या प्रतिनिधींनी गणेशोत्सवाबाबत महत्त्वाचा निर्णय ऑनलाईन बैठकीतून घेतला आहे. कोरोना पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात गर्दी जमू नये म्हणून यंदा गणेशोत्सव साध्या आणि पारंपारिक पद्धतीने साजरा केला जाईल, अशी घोषणा पुण्याच्या आठ प्रमुख गणेश मंडळांनी गुरुवारी केली.