मुंबईत पाऊस सुरू झाला की, रस्त्यावर खड्डे पडून अक्षरश: चाळण होते. आपण चांद्रभूमीवर आहोत की काय असा प्रश्न पडतो. त्याचा सगळ्यात मोठा फटका वाहन चालकांना बसतो. या खड्ड्यांमध्ये पडून काहींना हकनाक आपला जीव गमवावा लागत आहे, तर काही जण पडून जखमी होत आहेत. बर्याच जणांचे पाठीचे मणके बाद झाले आहेत. तर दुसर्या बाजूला हे खड्डे शहरातील डॉक्टर आणि गॅरेजवाल्यांच्या फायद्याचे ठरत आहेत. त्यामुळे त्यांचे अच्छे दिन आले आहेत.
मुंबई एकाद्या ठिकाणी लवकर पोहोचण्यासाठी टॅक्सी आणि रिक्षांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे या खड्ड्याचा फटका त्यांनाच जास्त बसत आहे. त्यामुळे टॅक्सी आणि रिक्षा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. वाहनांच्या बेअरिंग, शॉक अॅबसॉर्बर्स खराब होत आहेत. त्याच्या दुरुस्तीसाठी वाहनचालकांना आर्थिक फटका बसत आहे.
दुरुस्ती करावयाच्या वाहनांमुळे गॅरेजवर प्रचंड गर्दी दिसून येते. मुंबईतील महामार्गांवर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडी आणि वाहनांचा बिघाड यामुळे आम्हाला दुहेरी फटका बसत आहे, असा टॅक्सी रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. खड्ड्यांमुळे आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झालेला आहे.
मुंबईत रस्त्यांवर ३० लाख वाहने
मुंबईत दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. तसेच रस्त्यावरील पावसाळ्यात खड्डे पडण्याचे प्रमाणही वाढत आहे. शहरातील सर्व वाहनांची संख्या सुमारे ३० लाख इतकी आहे. त्यापैकी ४८ हजार टॅक्सी तर १ लाख ५० हजार रिक्षा आहेत.
वाहन चालकाचे आरोग्य धोक्यात
मुंबईतील खड्डयांमुळे वाहन चालवताना झटके बसतात. त्यामुळे मणक्यासह मान, पाठ आणि कंबर दुखीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे मानेचे बेल्ट, कमरेचे बेल्ट लावून आणि वेदनाशामक औषधे घेऊन वाहन चालवावी लागतात. डॉक्टरांकडे उपचारासाठी जावे लागते.
टॅक्सीचे व्हील अलायन्मेंट, शॉक अॅबसॉर्बर्सचे खड्ड्यांमुळे मोठे नुकसान होते. वाहनांची दुरुस्ती करण्यासाठी २० ते २५ हजार रुपयाचे खर्च येतो. येवढे पैसे आम्ही कुठून आणायचे.
– आर.बी. यादव, टॅक्सी चालक.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आमच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. वाहतूक कोंडीमुळे आम्हाला टॅक्सी धीम्या गतीने चालवाव्या लागतात. त्यामुळे कमी फेर्या होतात. आमचे मोठे नुकसान होते.– आंनद गोड, टॅक्सी चालक
सरकारकडून वाहतूक कर घेतला जातो. मात्र रस्ते खड्डेमुक्त केले जात नाहीत. जागो जागी खड्डे पडलेले असतात. त्यामुळे जीवित हानी होण्याची शक्यता असते. प्रशासनाने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा टॅक्सी आणि रिक्षा चालकांना वाहतूक बंद करावी लागेल.
के. के. तिवारी – अध्यक्ष, स्वाभिमानी टॅक्सी रिक्षा संघटना