ब्लू व्हेल या ऑनलाईन गेमनंतर आता देशभरातील पालकांची मोमो गेमने झोप उडवली आहे. आपली मुले या गेमच्या जाळ्यात अडकून नये, यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. मोमोमुळे पालकांसमोबतच शिक्षकही चिंतातूर झाले आहेत. त्यामुळे या गेमवर भारतात बंदी घालण्याची मागणी होत आहे. या मागणीसाठी मुंबईतील शिक्षकाने थेट केंद्रीयमंत्री रवी शंकर प्रसाद यांना साकडे घातले आहे. आता याप्रकरणी सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
देशभरात सध्या मोमो या ऑनलाईन गेमचे थैमान सुरु आहे.
सध्या सोशल नेटवर्किंगसाईटवर याच गेमची चर्चा सुरु आहे. हे ‘मोमो’व्हॉटस् अॅप चॅलेंज तरुणांना आत्महत्या करायला प्रवृत्त करत आहे. दरम्यान पश्मिम बंगालमध्ये या मोमो गेम विरोधात लेखी तक्रार नोंदवल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी इथल्या या एका कॉलेज विद्यार्थिनीने ही मोमो विरोधातील तक्रार नोंदवली आहे. त्यामुळे सध्या पालकांमध्ये या गेमवरुन भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या शाळकरी मुलांमध्येदेखील याच गेमची चर्चा सुरु असल्याचे शिक्षकांच्या कानी पडत आहे. त्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे. मुंबईतील महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी याप्रकरणी थेट केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांच्याकडे धाव घेतली आहे. विद्यार्थी हित लक्षात घेऊन या गेमवर भारतात बंदी घालण्याची मागणी बोरनारे यांनी केली आहे.
काही महिन्यांपूर्वी ब्लू व्हेल गेमची दहशत निर्माण झाली होती. त्यानंतर आता मोमो चॅलेंच हा गेम समोर आला आहे. सध्या विद्यार्थ्यांमध्ये या गेमची चर्चा सुरु आहेत. त्यामुळे या गेमला वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून यासंदर्भात केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांच्याकडे तक्रार केली आहे. या गेमवर बंदी घालण्याची मागणी केली आहे, असे अनिल बोरनारे त्यांनी ‘महानगर’शी बोलताना सांगितले.