उशीरा का होईना पण राज्यात थंडी अखेर सुरू झाली आहे. गुरूवारची पहाट मुंबईकरांची बोचऱ्या थंडीने झाली. बुधवार संध्याकाळपासूनच अनेक भागात गारठ्याला सुरूवात झाली होती. मुंबईचे तापमान महाबळेश्वरपेक्षा दोन डिग्रीने कमी होते. महाबळेश्वरमध्ये १४.२ तर बोरिवलीत १२ डिग्री इतके किमान तापमान नोंद झाले. पुढचे दोन दिवस मुंबईत थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
गेल्या काही दिवसांपासून जम्मू- काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळेच याचा परिणाम मुंबईच्या तापमानावर झाला आहे. मुंबईचे तापमान घसरले आहे. घसरत्या तापमानाबरोबरच प्रदूषणातही वाढ झाली आहे. मुंबईची हवाही बिघडली आहे. धुरके आणि धुक्यामुळे पहाटेच्या वेळेस दृश्यमानता कमी होत आहे. पुढील दोन दिवसांत मुंबईचा पारा १ ते २ डिग्रीने कमी होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
अजून वाढू शकतो थंडीचा कडाका
सध्या जम्मू-काश्मीरमध्ये म्हणजे उत्तरेकडे तुफान बर्फवृष्टी सुरू आहे. जम्मू- काश्मीरमध्ये ३ते ४ फूट इतका बर्फ साचला आहे. येथून वाहणाऱया थंड वाऱयांनी मुंबईकरांना गारठून टाकले आहे. मुंबईत सांताक्रुझ येथे किमान तापमान १६.९ डिग्री तर सर्वात कमी तापमान बोरिवलीत १२डिग्री सेल्सियस इतके नोंदवले गेले. मुंबईतले किमान तापमान १५ डिग्रीपर्यंत खाली येईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.