मुंबई विद्यापीठाने लॉ अभ्यासक्रमाच्या परीक्षा प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णयाबाबत कोणताही ठोस निर्णय जाहीर न केल्याने विद्यार्थ्यांसमोर संभ्रमावस्थेची नवी परीक्षा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या केटीच्या परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांना त्याचा सर्वात मोठा फटका बसण्याची भीती विद्यार्थ्यांकडून वर्तविण्यात येत असून कोणत्या परीक्षा पद्धतीत परीक्षा द्यायची, असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. तर विद्यापीठाने येत्या काळात कोणत्याही ठोस निर्णय न जाहीर केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा आता विद्यार्थी संघटनांनी दिल्याने यावरुन नवा वाद उभे राहण्याची शक्यता निर्माण होणार आहे.
विद्यार्थी अजूनही अधांतरीच!
मुंबई विद्यापीठाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेनुसार गेल्या काही वर्षांपूर्वी श्रेयांक श्रेणी ही पध्दत सुरु केली आहे. मात्र लॉ अभ्यासक्रमाला यातून वगळण्यात आले होते. त्यानंतर नुकतेच विद्यापीठाने लॉ अभ्यासक्रमासाठी देखील ही पध्दत सुरु करताना ६०/४० ही नवी प्रणाली अंमलात आणली आहे. या निर्णयाला विद्यार्थ्यांनी विरोध केला असून यावरुन गेल्या अनेक दिवसांपासून गदारोळ सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच याला विरोध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन देखील केले होते. त्यानंतर यासाठी विद्यापीठाने विशेष बैठक २४ सप्टेंबरला आयोजित केली होती. त्यावेळी नवीन शैक्षणिक वर्षांपासून ही पध्दत सुरु करण्याबरोबरच इतर काही प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली होती. त्यावेळी येत्या आठवड्यात याबाबत अंतिम निर्णय जाहीर करण्यात येईल, असे आश्वासन विद्यापीठाने यावेळी विद्यार्थी संघटनांना दिले होते. तत्पूर्वी विद्यापीठाने या निर्णयासंदर्भातील सर्व पत्रके विद्यापीठाच्या वेबसाईटवर काढून टाकली आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या नजरा विद्यापीठाकडून जाहीर होणार्या परिपत्रकावर लागून राहिले असून अद्याप परिपत्रक जाहीर न केल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरल्याची माहिती संघटनांकडून देण्यात आली आहे.
तुम्ही हे वाचलंत का? – मुंबई विद्यापीठात पीएफ घोटाळा
परीक्षेची तयारी करायची कशी?
याबद्दल बोलताना स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार म्हणाले की, आम्ही या अगोदरच ६०/४० ला विरोध केला आहे. पण त्यानंतर शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातील याची अंमलबजावणी करु नये, अशी देखील आम्ही केली होती. नव्या शैक्षणिक वर्षांपासून सुरु होणार्या नव्या बॅचसाठी ही पध्दत वापरावी, असा प्रस्ताव देखील आम्ही विद्यापीठासमोर दिला होता. यासंदर्भात झालेल्या बैठकीत आम्ही तशी चर्चाही केली होती. मात्र अद्याप अंतिम निर्णय जाहीर न केल्याने विद्यार्थी चिंतेत आहेत. परीक्षा सुरु होण्यास एक महिना शिल्लक आहे, असे असताना प्रोजेक्ट कसा करायचा, परीक्षेची तयारी कशी करायची, याचे उत्तर विद्यार्थ्यांना मिळालेले नाही. त्यामुळे आता पुन्हा विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून आता पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर आली आहे. त्यानंतरही जर याकडे लक्ष न दिल्यास न्यायालयात जाण्याची वेळ आमच्यावर येणार आहे.