सरकारच्या कामांचे मूल्यांकन करावे
लोकसभा निवडणुकीत विजयासाठी सर्वच पक्षांतील उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे. आता तर सोशल मीडियामुळे प्रचार करत लोकांपर्यंत पोहोचणे सहज शक्य झाले आहे. त्याद्वारे सत्ताधार्यांसह विरोधक एकमेकांवर विविध आरोप प्रत्यारोप करतानाचे चित्र सोशल मीडियावर दिसत आहेत. सुजाण मतदाराने मात्र सोशल मीडियावरील सर्व पक्षियांतर्फे सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांना बळी पडू नये. मतदाराने मतदानापूर्वी मागील सरकारच्या कामगिरीचे स्वतः मूल्यांकन करावे आणि स्वतः केलेल्या मूल्यांकनाच्या आधारे मतदाराने आपले मत नोंदवावे, असे मला वाटते. सतीश नायक, सदस्य, जीएसबी गणेश मंडळ
जाहीरनाम्यातील आश्वासने पाळावीत सध्या लोकसभा निवडणुकांमुळे देशातील राजकीय वातावरण तप्त झाले आहे. सर्वच लहानसहान पक्षांनी राष्ट्रीय पक्षांशी हातमिळवणी केल्याचे चित्र आहे. तर काहींनी स्वतंत्रपणे राष्ट्रीय पक्षांनाही आव्हान ठरणार्या युती केल्याचे आपण पाहत आहोत. परिणामी उमेदवाराच्या प्रचारात कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निमर्aाण झाला असून कोणता झेंडा घेऊ हाती? अशीच काहीशी परिस्थिती दिसत आहे. राजकीय पक्षांनी प्रत्येक निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही जाहीरनाम्याद्वारे आश्वासनांची खैरात केली आहे. तेव्हा निवडून येणार्या उमेदवारांनी जाहीरनाम्यातील आश्वासने पाळावीत एवढीच माफक अपेक्षा एक मतदार म्हणून मी करते.
– अर्चना मांढरे, विद्यार्थिनी
युवा विचारांचे सरकार अपेक्षित
शिक्षणाचा ढासळता दर्जा, वाढती बेरोजगारी यामुळे देशातील युवा वर्गात नाराजी पसरली आहे. त्यातच आतापर्यंत झालेल्या जवळपास सर्वच निवडणुकांमध्ये जातीय समीकरणांवर आधारित राजकारण केल्याचे आपण पाहत आलो. देशातील जातीय दंगली, राजकारण या सर्वांना देशातील जनता कंटाळली असून समाज हिताची, समाजोपयोगी धोरणे राबविणारे, युवा विचारांचे सरकार यंदा निवडून येईल असे मला वाटते. त्यामुळे स्थानिक प्रश्नांसह, महिला सबलीकरण, रोजगार, संरक्षण, बेरोजगारी, शाश्वत विकास आदी सर्व महत्वाच्या मुद्यांचा विचार करून मतदारांनी न विसरता मतदान करावे.
– रवी जाधव, विद्यार्थी