घरताज्या घडामोडीनवी मुंबई पालिकेचा कर्मचाऱ्यांसाठी दिवाली धमाका! २५ हजार बोनस जाहीर!

नवी मुंबई पालिकेचा कर्मचाऱ्यांसाठी दिवाली धमाका! २५ हजार बोनस जाहीर!

Subscribe

यावर्षीचा दिवाळी सण १४ नोव्हेंबर पासून सुरू होत असून नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांची दिवाळी आनंदात जावी याकरिता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी महानगरपालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी यांना २५ हजार व करार तसेच तात्पुरत्या स्वरूपातील कर्मचारी यांना १९ हजार रुपये दिवाळी सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण ४६१० अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. मागील वर्षी देखील अधिकारी व कर्मचाऱ्यांना २५ हजार रुपये बोनस देण्यात आला होता. त्यामध्ये कोणतीही कपात न करता यंदा देखील तेवढाच बोनस जाहीर करण्यात आला आहे. एमएमआर रिजनमध्ये कर्मचाऱ्यांना सर्वाधिक बोनस देणारी नवी मुंबई महापालिका आहे. सुरवातीपासूनच मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांपेक्षा अधिकचा बोनस नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना देण्यात येतो.

यामध्ये महापालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी तसेच राज्य शासनाकडील बदलीने, प्रतिनियुक्ती, प्रशिक्षणार्थी अधिकारी – कर्मचारी यांना २५ हजार सानुग्रह अनुदान दिले जात आहे. तसेच किमान वेतनावरील तात्पुरत्या स्वरूपात करार पद्धतीवरील वेतनश्रेणीमध्ये कार्यरत असणारे अधिकारी – कर्मचारी, रोजंदारीवरील आरोग्य सेवक, मानधनावरील बालवाडी शिक्षक व मदतनीस यांना १९ हजार इतकी सानुग्रह अनुदान रक्कम प्रदान केली जात आहे.

- Advertisement -

याशिवाय सर्व शिक्षा अभियान व राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत शासनाने कंत्राटी तत्वावर नेमलेले व शासनाकडून मानधन प्राप्त होणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही करार पद्धतीवरील कर्मचाऱ्यांप्रमाणे १९ हजार इतके सानुग्रह अनुदान त्याचप्रमाणे आरोग्य विभागातील आशा वर्कर यांना ९ हजार सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. सध्याच्या कोव्हीड १९ च्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी सुरूवातीपासून कोव्हीड विरोधातील लढ्यात अत्यंत समर्पित भावनेने काम करीत असून त्यांची दिवाळी आनंदात जावी याकरिता प्रशासक तथा आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतलेल्या या कर्मचारीहिताय निर्णयाचे अधिकारी-कर्मचारी वर्गाकडून स्वागत करण्यात येत आहे.

कोविडच्या काळात देखील कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात टाकून आपले कर्तव्य बजावले. सर्वोत्कृष्ट महानगरपालिका म्हणून नवी मुंबईला सातत्याने देशात तिसरा व राज्यात पहिला क्रमांक मिळवून देण्यात कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना योग्य न्याय देण्याचे कर्तव्य प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे आहे. म्हणूनच आमदार गणेश नाईक यांनी पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे मागणी केली. आयुक्तांनी देखील सदर मागणी मान्य केल्याची प्रतिक्रिया नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी आपलं महानगरशी बोलताना व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -