राज्यात सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर प्रचंड वेगाने घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांनी शनिवारी नियमानुसार सर्वाधिक जागांवर निवडून आलेल्या भाजपला सत्ता स्थापनेचे आमंत्रण दिले. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपने आता अल्प मतांवर सत्ता स्थापन केले आणि विधानसभेत जेव्हा स्थिर सरकार स्थापन करण्याची वेळ येईल तेव्हा राष्ट्रवादी भाजपच्या विरोधात मतदान करेल, असे नवाब मलिक म्हणाले आहेत.
हेही वाचा – Live: सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार? ‘वर्षा’वर भाजपच्या कोर कमिटीची बैठक
नेमके काय म्हणाले नवाब मलिक?
‘राज्यपाल महोदयांनी भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित केलेले आहे. ही प्रक्रिया आधीच पूर्ण झाली असती. पण आता राज्यपाल महोदयांनी खातरजमा करुन घेतले पाहिजे की, भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे की नाही. अन्यथा या राज्यात घोडेबजार होऊ नये, याची खातरजमा देखील राज्यपालांनी केली पाहिजे. भाजपचे जर सरकार बनवत असेल तर विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या विरोधात मतदान करणार आहे. पटलावर सरकार पडल्यानंतर महाराष्ट्राच्या हितासाठी एक पर्याय सरकार निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करु’, असे नवाब मलिक म्हणाले.
हेही वाचा – सेनेनं राजकारणाचा व्यापार केला नाही – संजय राऊत