पुणे येथे आयोजित केलेल्या एल्गार परिषदेसाठी नक्षलवाद्यांनी पैसा पुरवला असल्याचा गौप्यस्फोट पुणे पोलिसांनी केलाय. तर भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी बुधवारी अटक करण्यात आलेले सर्व आरोपी नक्षलवादी संघटनांशी संबंधीत असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. पुण्याचे सहआयुक्त रवींद्र कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. पुणे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींच्या घरी छापे मारले होते. या छाप्यांदरम्यान त्यांना सापडलेली कागदपत्रे ही नक्षलवाद्यांशी संबंधित असल्याने आरोपींना अटक करण्यात आलं असल्याचा दावा रवींद्र कदम यांनी केलाय.
Among the accused registered in FIR on 8 Jan, some were previously booked for having links with naxals. We were investigating their links & in this connection, we raided houses of some of them: Ravindra Kadam, Joint Police Commissioner, Pune on arrests made in #BhimaKoregaon case pic.twitter.com/1fLUQNxlK2
— ANI (@ANI) June 7, 2018
भीमा कोरगावा हिंचारप्रकरणी एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे यांच्यासह ४ जणांना पोलिसांनी अटक केली. या पाच आरोपींचा संबंध नक्षलवाद्यांशी दिसून येत आहे. तसंच १ जानेवारी रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनात नक्षलवाद्यांचा हात होता. या परिषदेसाठी नक्षलवाद्यांचा पैसा वापरण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितलं. अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींच्या घरातून सापडलेल्या साहित्यावरुन त्यांचा संबंध नक्षलवाद्यांशी असल्याचे स्पष्ट होत असल्याचे रवींद्र कदम यांनी सांगितलं.
पुणे पोलिसांनी बुधवारी अॅड. सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत आणि सोमा सेन यांना नागपूरातून अटक केली. तर नक्षलवाद्यांचा नेता रोना विल्सन याला दिल्लीतून अटक केली. अॅड. सुरेंद्र गडलिंग याला आज शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आलं. कोर्टाने त्याला १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर इतर आरोपींना देखील न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे कदम यांनी सांगितलं.
आरोपी रोना विल्सनच्या घरातून पोलिसांनी पेन ड्राईव्ह, हार्डडिस्क आणि काही कागदपत्रे जप्त केली आहेत. त्यांना न्यायवैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. विल्सनच्या कॉम्प्युटरमधून पोलिसांना एक पत्र मिळाले असून ते फरार नक्षलावादी नेता मिलिंद तेलतुंबडे याने लिहीलेले आहे. या पत्रात काँग्रेसच्या काही नेत्यांचा आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख आहे. जानेवारी महिन्यांतील हे पत्र असल्याचं रवींद्र कदम यांनी सांगितलं. दरम्यान या सर्व आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.