लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघामध्ये सुपुत्राच्या पराभवावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. पार्थच्या पराभवाची जबाबदारी सर्वस्वी माझी असल्याचे अजित पवार यांनी सांगितली. मावळ लोकसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादीचा पराभव मी स्वीकारला आहे. तसेच जनतेने दिलेला कौल आम्ही स्वीकारला असून पराभवाची जबाबदारी अजित पवार म्हणून माझीच आहे, असी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
हे वाचा – महाआघाडीचे आमदार भाजपमध्ये जाणार? विरोधकांना आमदार वाचवण्याची चिंता
विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात
लोकसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांची आज महत्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि काही महिन्यावर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या रणनितीबाबत चर्चा झाली. या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, हितेंद्र ठाकूर, जोगेंद्र कवाडे, अबू आझमी हे नेते उपस्थित होते. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलं पाहिजे. दुष्काळ परिस्थिती मोठी असून त्याचा मुकाबला कसा करायचा यावर आम्ही चर्चा केली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
"अजित पवार म्हणून हा पराभव माझाच" – पार्थ पवारचा मावळ लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर @AjitPawarSpeaks यांची पहिलीच प्रतिक्रिया. pic.twitter.com/HnJX1KUaPe
— My Mahanagar (@mymahanagar) May 28, 2019
हे देखील वाचा – पार्थ पवारांना पाडणाऱ्या श्रीरंग बारणे यांचे मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक
बारणेंनी केला पार्थचा पराभव
लोकसभा निवडणूकी दरम्यान मावळ लोकसभा मतदार संघ खूप महत्वाचा होता. या मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण या मतदार संघामधून शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र या मतदारसंघामध्ये पार्थ पवार यांचा दारुन पराभव झाला. शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी २ लाख मतांनी पार्थ पवारांचा पराभव केला. श्रीरंग बारणेंना ७ लाख २० हजार ६६३ मते मिळाली तर पार्थला ५ लाख ४ हजार ७५ मते मिळाली.