महाराष्ट्रात दुपारी एकच्या दरम्यान धडकलेले निसर्ग चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेने वळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. राज्यातील कोकण किनारपट्ट्यांवर सर्वात प्रभावी असे हे निसर्ग चक्रीवादळ अलिबागला धडकले असून पुढे रायगडच्या किनारपट्ट्यावरून मुंबईच्या दिशेने आले. मुंबई, ठाणेनंतर हे वादळ पालघरच्या दिशेने जाऊन गुजरातच्या मार्गे जाणार असल्याचे भारतीय हवामान खात्याने सांगितले.
दरम्यान “नागरिकांनी सुरक्षित ठिकाणीच रहावे. सरकार व प्रशासन आपली सर्वतोपरी काळजी घेत आहे. सर्वांनी आपली काळजी घ्यावी आणि सुरक्षित राहावे,” असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
नागरिकांनी सुरक्षित ठिकाणीच रहावे. सरकार व प्रशासन आपली सर्वतोपरी काळजी घेत आहे. काळजी घ्या, सुरक्षित राहा.#NisargaCyclone
— Supriya Sule (@supriya_sule) June 3, 2020
तसेच, “अरबी समुद्रात तयार झालेलं निसर्ग हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर येत आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील नागरिकांनी कृपया घरातून बाहेर पडू नये. घाबरुन न जाता सरकारकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करावे,”,असेही त्यांनी जनतेला अवाहन केले आहे.
अरबी समुद्रात तयार झालेलं 'निसर्ग' हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर येत आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील नागरिकांना विनंती आहे की,कृपया घरातून बाहेर पडू नये.घाबरुन न जाता सरकारकडून येणाऱ्या सुचनांचे पालन करावे.
— Supriya Sule (@supriya_sule) June 3, 2020
अडचणीत सापडलेल्या लोकांना मदतीचा हात
‘निसर्ग’ चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला धोका निर्माण झाला आहे. आपण प्रशासनासोबत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उभे राहावे, असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत.
संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मंगळवारपासूनच ‘निसर्ग’ चक्रीवादळ ९० ते १२० च्या वेगाने घोंघावत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्हयांना या चक्रीवादळाचा तडाखा बसला असून मुंबई, ठाणे यांनाही फटका बसणार आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आणि होणार आहे. अशावेळी प्रशासन सतर्क राहून काम करत आहेत. या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही प्रशासनासोबत मदतीला उतरण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.
यासह, वादळी वाऱ्यांचा तडाखा बसल्याने सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या लोकांना तात्काळ मदतीचा हात द्यायला हवा, असेही शरद पवार यांनी सांगितले आहे.