राष्ट्रवादी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार
मुंबई
मुंबई महापालिकेकडून नालेसफाईचा दावा केला जात असला तरी नालेसफाईच्या नावाखाली भ्रष्टाचार आणि भोंगळ कारभार सुरू आहे. त्यातून मुंबईकर नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केला आहे. नालेसफाई झाली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा पालिकेतील गटनेत्या राखी जाधव यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून नालेसफाईची पाहणी
पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सुरू असलेल्या नालेसफाईची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली. या पाहणीनंतर अहिर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना राष्ट्रवादीच्या महापालिकेतील गटनेत्या राखी जाधव व पालिकेच्या अधिकाऱ्यांसह धारावीमधील कमाल नगर, ६० फूटरस्ता व इतर नाल्यांची पाहणी केली. त्यावेळी अनेक नाले कचऱ्याने भरलेले निदर्शनास आले. काही ठिकाणी पाहणी होणार म्हणून जेसीबी लावून नालेसफाई सुरू करण्यात आल्याचे अहिर यांनी सांगितले.
नालेसफाई झाले नाही तर, राष्ट्रवादी कॉग्रेस करणार आंदोलन
पालिकेतील राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव म्हणाल्या की, जानेवारी महिन्याच्या दरम्यान नालेसफाईच्या निविदा निघाल्या असताना अजूनही नालेसफाई पूर्ण झालेली नाही. पावसाळा तोंडावर आला असला तरी नालेसफाई पूर्ण होईल, याची शक्यता नाही. नालेसफाईची अवस्था आम्ही आयुक्तांना कळवणार असून नालेसफाई पूर्ण झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईभर रस्त्यावर उतरून आंदोलन करील. मी स्वतः या नालेसफाईबाबत पालिकेकडे लाईव्ह मॉनिटरिंगची मागणी केली आहे. हा मुद्दा लावून धरणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले.
जनता सूज्ञ आहे – अहिर
डेडलाईन दहा दिवसांवर आली असल्याने नालेसफाई कशी होणार? नालेसफाई होत असताना वॉच डॉगच्या भूमिकेत असणारे आता कुठे आहेत, असे प्रश्न अहिर यांनी उपस्थित केले. महापौरांनी मुंबई तुंबल्यास त्याला राज्य सरकार जबाबदार असेल असे विधान केले होते. महापौरांचे हे वक्तव्य दुर्दैवी असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. सत्तेत सहभागी असणाऱ्यांनी एकमेकांकडे बोटे दाखवून चालणार नाही. जनता सूज्ञ आहे, अशी प्रतिक्रिया अहिर यांनी यावेळी दिली.