महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक शब्दप्रयोग असे आहेत, जे कायमचे स्मरणात राहिले आहेत. ‘हिमालयाच्या मदतील सह्याद्री धावल’, ‘कात्रजचा घाट’ आणि ‘खंजीर’ यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारण प्रचलित झालेला शब्दप्रयोग म्हणजे ‘आम्ही सत्तेला लाथ मारू’. मागच्या साडे चार वर्षात शिवसेनेने या वाक्याचा स्वाभिमान दाखवण्यासाठी अनेकदा वापर केला. मात्र आता हेच वाक्य त्यांच्या अंगलट येताना दिसत आहे. काल शिवसेना-भाजपची युती झाल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने मुंबईत ठिकठिकाणी ‘आम्ही सत्तेला लाथ मारू’ या ऐतिहासिक वाक्याला भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त केली आहे. यासाठी शिवसेना भवन आणि मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी तसे बॅनरच लावण्यात आले आहेत.
शिवसेनेने महत्त्व प्राप्त करुन दिलेल्या 'आम्ही सत्तेला लाथ मारू' या अजरामर वाक्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेसने उडवली खिल्ली. युती झाल्यानंतर या वाक्याला वाहिली श्रद्धांजली… मुंबईत ठिकठिकाणी बॅनरबाजी. @Awhadspeaks @iNitinDeshmukh @supriya_sule @dhananjay_munde @MumbaiNCP pic.twitter.com/gjQ7CNl5wh
— My Mahanagar (@mymahanagar) February 19, 2019
काल मातोश्रीवर झालेल्या बैठकीत भाजप अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीवर शिक्कामोर्तब केले. युतीसाठी आमचे काही मुद्द्यावर एकमत झाले असल्याचे दोन्ही पक्षांतर्फे सांगण्यात येत असले तरी मागच्या साडे चार वर्षांत दोन्ही पक्षांनी एकमेकांवर केलेली चिखलफेक लोक विसरलेले नाहीत. त्यापैकीच आम्ही सत्तेला लाथ मारू, हे एक वाक्य.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबईतीलि पदाधिकारी नितीन देशमुख यांनी या वाक्यालाच श्रद्धांजली व्यक्त करुन, शिवसेनेची चांगलीच गोची केली आहे. त्यांनी मुंबईच्या घाटकोपर श्रेयस सिग्नल, मातोश्री बंगला, वरळी सी लिंक, शिवसेना भवन, प्रेस क्लब अशा ठिकाणी हे बॅनर लावून युतीची खिल्ली उडवली आहे.