कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय उच्च शिक्षण मंडळाने (सीबीएसई ) इयत्ता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आतापर्यंतच्या शैक्षणिक कामगिरीवर ग्रेड देण्याचा तर पहिली ते आठवी इयत्तेमधील विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई मंडळाने मार्च १९ ते ३१ मार्चदरम्यान होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. त्यानंतर केंद्र सरकारने २१ दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला. यामुळे इयत्ता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे शक्य नसल्याचे शाळांनी मंडळाला कळवले आहे.
हेही वाचा- सीएची परीक्षा पुढे ढकलली; नवीन वेळापत्रक जाहीर
सीबीएसईचे शाळांना आदेश
त्यानुसार मंडळाने नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना ग्रेड पध्दतीने पास करण्याचा निर्णय घेतला आहे. हे ग्रेड विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक वर्षात केलेले प्रोजेक्ट, अंतर्गत परीक्षा, वर्षभराची हजेरी याचा अभ्यास करुन शाळांनी नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना ग्रेड देऊन पुढच्या वर्षात पाठवावे, असे आदेश सीबीएसईने शाळांना दिले आहेत. जे विद्यार्थी शाळांकडून घेण्यात आलेल्या अंतर्गत परीक्षा आणि प्रोजेक्टमध्ये पास होत नाहीत. त्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने शाळांनी परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना पुढील वर्षात पाठविण्याचे आदेश शाळांना दिले आहे. त्याचप्रमाणे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करत सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.