घरमुंबई…तर मुंबईत एकाही सार्वजनिक उत्सव मंडळाची गणेश मूर्ती बनवणार नाही

…तर मुंबईत एकाही सार्वजनिक उत्सव मंडळाची गणेश मूर्ती बनवणार नाही

Subscribe

बृहन्मुंबई मूर्तिकार संघाने दिला इशारा; चित्रशाळेसाठी परवानगी न दिल्याने मूर्तिकार संतप्त

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीची उंची किती असावी, यावर सरकार निर्णय घेते. परंतु ही गणेश मूर्ती बनवण्याबाबत त्यांना कोणताही निर्णय घेता येत नाही. आजही गणेश मूर्ती बनवण्यासाठी मूर्तिकारांना चित्रशाळा तसेच कारखान्यांना कोणत्याही प्रकारची परवानगी दिली गेली नाही. तर मग आम्ही या गणेश मूर्ती कशी आणि कुठे बनवायची? असा सवाल करत बृहन्मुंबई मूर्तिकार संघाने केला आहे. त्यामुळे जर ही परवानगी द्यायला सरकार आणि महापालिकेची इच्छा नसेल तर एकाही सार्वजनिक उत्सव मंडळाची गणेशमूर्ती बनवली जाणार नाही, असा इशारा मूर्तिकार संघाने दिला आहे.

मूर्तिकार संघाचे अध्यक्षाची तीव्र नाराजी

गणेश मंडळांनी यावर्षी मूर्तीची उंची कमी करण्यावर सहमती दर्शवली. त्यामुळे सर्व गणेश मंडळांनी एकमताने तयारी दर्शवल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गणेश मूर्तींची उंची ४ फुटांपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांपासून सरकार गणेश मूर्तीच्या उंचीबाबतच खलबत माजवत होते. अखेर त्यावर दोन दिवसांपूर्वी निर्णय घेण्यात आला. मात्र गणेश मूर्तीबाबत निर्णय घेतला असला गणेश मूर्ती बनवणाऱ्या मूर्तीकारांच्या समस्येबाबत आणि चित्रशाळांच्या परवानगीबाबत कोणताही निर्णय सरकार आणि महापालिकेने घेतलेला नाही. त्यामुळे बृहन्मुंबई मूर्तिकार संघाचे अध्यक्ष गजानन तोंडवळकर यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

- Advertisement -

सरकारने मूर्तीच्या उंचीबाबत निर्णय घेतला. पण मूर्ती तयार कुठे करणार याबाबत काहीही वाच्यता केलेली नाही. त्यामुळे आम्ही मूर्ती बनवायची कुठे असा सवाल त्यांनी केला. महापालिकेने अद्यापही याबाबत परिपत्रक जारी केलेले नाही. आणि कार्यशाळेसाठी परवानगीही देत नाही. त्यामुळे मूर्ती बनवायची कुठे असा सवाल करत एका बाजुला पर्यावरणपुरक मूर्ती बनवण्याचे आवाहन करायचे आणि दुसरीकडे त्यासाठी कुठलीही मदत करायची नाही, ही सरकार आणि महापालिकेची भूमिका योग्य नसल्याचे सांगितले.

सध्या आम्ही पर्यावरणपुरक मूर्ती बनवण्यासाठी शाडूची माती गुजरातही आणली आहे. परंतु पूर्वी जिथे चार महिने आधी गणेश मूर्तिकारांना मूर्ती बनवण्यासाठी परवानगी दिली जायची. तिथे आता ४० दिवसही परवानगी मिळत नाही. मग शाडूची मूर्ती सुकवणार कधी आणि रंगकाम करून ती भक्तांना पुजेसाठी देणार कधी असा सवाल त्यांनी केला. तर जर अशीच परिस्थिती राहिली तर यंदा केवळ घरगुती गणेशमूर्तीच सर्व मूर्तिकार बनवतील. परंतु एकही सार्वजनिक गणेशमूर्ती बनवली जाणार नाही. आणि याला सरकार आणि महापालिकाच जबाबदार असेल, असा इशारा गजानन तोंडवळकर यांनी दिला आहे.

- Advertisement -

आगमनासह विसर्जनाची सरकारला चिंता, पण मूर्तींचे काय?

दोन वर्षांपूर्वी जेव्हा गणेश मूर्तिकारांच्या समस्याबाबत भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्यासमवेत बैठक झाली होती.तेव्हा महापालिका आयुक्त असलेले अजोय मेहता यांनी सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मूर्ती हवी कशा असा सवाल करत गणपतीचा फोटो बसवून उत्सव साजरा करा, असे सांगितले होते. आज तेच अजोय मेहता राज्याचे मुख्य सचिव आहेत. सरकार बदलले तरी मूर्तिकारांसमोरील समस्या कायमच आहेत. आज सरकार आगमन आणि विसर्जनाची आधी तयारी करत आहे. पण मूर्ती तयार करण्याबाबत काहीही विचार करत नाही ही सर्वात मोठी शोकांतिका असल्याचेही तोंडवळकर यांनी म्हटले आहे.

…तर मूर्तिकार करणार आंदोलन

मुर्तिकारांच्या प्रश्नांकडे सरकार आणि महापालिका लक्ष देत नाही. त्यामुळे मूर्तिकारांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. त्यामुळे आपल्या न्याय हक्कासाठी डोक्यावर गणेश मूर्ती किंवा शाडू माती घेवून सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याच्या पावित्र्यात मूर्तिकार आहेत. त्यामुळेच या आंदोलनाची तयारी सुरु आहे. मात्र, कोरोनामुळे मुंबईतील संघाचे सदस्य असलेल्या शेकडो मूर्तिकारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून सरकारने सर्व मूर्तिकारांना नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी गजानन तोंडवळकर यांनी केली.


मूर्तीच्या उंचीवरून सरकारमध्ये गोंधळ, लालबागच्या राजावरून वाढतोय संभ्रम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -