मुंबईकरांची जीवनशैली इतकी आळशी आणि अनियमित झाली आहे की आता त्यांच्या डोक्यावर अनेक आजारांचं सावट पसरलं आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या एका अहवालानुसार एक लाख मुंबईकरांचं आरोग्य धोक्यात असल्याचं समोर आलं आहे. डायबिटीज आणि हायपरटेंशनच्या विळख्यात सापडल्याने मुंबईकर विकारांच्या जाळ्यात अडकले आहेत. आजारांना वेळीच ओळखून त्यावर उपचार करण्यासाठी महापालिकेकडून एक विशेष तपासणी मोहिम राबवण्यात आली. या तपासणी मोहिमेदरम्यान आढळलेल्या रुग्णांना तात्काळ आरोग्य केंद्रात पाठवलं गेलं. कारण, हायपरटेंशनमधून होणारा स्ट्रोक, हृदयविकार आणि डायबिटीजमधून होणारे यकृत, किडनी आणि शरीराच्या इतर अवयवांना इजा पोहचू नये यासाठीही खबरदारी घेण्यात आली.
१३ लाख लोकांची तपासणी
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून काही दिवसांपूर्वी अंससर्गजन्य आणि संसर्गजन्य आजार याबाबत एक विशेष तपासणी मोहिम राबवली होती. यात कुष्ठरोग, टीबी, डायबिटीज, हायपरटेंशन आणि कॅन्सर या आजारांसाठी ही तपासणी मोहिम घेण्यात आली होती. आरोग्य विभागाच्या एकूण २ हजार ५०० हून अधिक कर्मचारी २२ वॉर्डमध्ये आरोग्य अधिकारी तपासणी करण्यासाठी नेमण्यात आले होते. ३० हून अधिक वयोगटातील नागरिकांचा यात समावेश करण्यात आला होता. १३ लाख लोकांची या मोहिमेदरम्यान तपासणी करण्यात आली. यापैकी १ लाख मुंबईकर आरोग्याच्या धोक्यात असल्याचं आढळलं आहे. यात हायपरटेंशन आणि डायबिटीजची पातळी अधिक आढळली असून या नागरिकांना कधीही आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
कॅन्सर, टीबी आणि कुष्ठरोगीही सापडले
१ हजार १२७ मुंबईकरांमध्ये कॅन्सरची लक्षणं आढळली आहेत. तसंच, ५ हजारांहून अधिक संशयित टीबी रुग्ण प्राथमिक तपासणीसाठी आढळले असून १७२ रुग्णांना टीबीचा संसर्ग झाला आहे. या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये सखोल तपासणी आणि उपचारांसाठी पाठवण्यात आलं आहे. शिवाय, अनेकांवर उपचारही सुरू करण्यात आले आहेत. कुष्ठरोगासाठी २५ लाख मुंबईकरांची स्क्रिनिंग करण्यात आली. ज्यापैकी २ हजार ३६२ संशयित कुष्ठरोगग्रस्त आढळले आहेत. यांच्यावरसुद्धा उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाकडून १६ दिवसांत १० लाख घरांत राहणाऱ्या ४५ लाख नागरिकांची तपासणी करण्याचं लक्ष्य होतं.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार
२५ लाख ३७ हजार १४० लोकांची तपासणी
२ हजार ३६२ संशयित कुष्ठरोगी
५ हजार ३४२ संशयिट टीबी रुग्ण
१ हजार १२७ लोकांमध्ये कॅन्सरची लक्षणे
या तपासणी विशेष मोहिमेचा मुख्य उद्देश मुंबईकरांमध्ये असलेल्या आजारांना शोधून काढणं आणि वेळेवर त्यांच्यावर उपचार करणं हा होता. एक लाख मुंबईकर डायबिटीज आणि हायपरटेंशनच्या विळख्यात असणं ही गंभीर बाब आहे. या नागरिकांना अनेक समस्या उद्धवू शकतात. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आम्ही त्यांना वेगवेगळ्या आरोग्य केंद्रात पाठवलं आहे.
डॉ. संतोष रेवणकर, पालिकेच्या आरोग्य विभागाचे संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी