घरमुंबईमुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी आता नवी डेडलाईन!

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी आता नवी डेडलाईन!

Subscribe

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ज्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची प्रतिक्षा लागली आहे, त्या चौपदरीकरणासाठी अजून एक वर्ष लागणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. रत्नागिरी व सिधुदुर्ग जिल्ह्याची आढावा बैठक आज मंत्रालयात आयोजित केली होती. या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. मुंबई गोवा महामार्गाच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उदय सामंत म्हणाले की, ‘मुंबई गोवा महामार्गाचे काम चार टप्प्यात होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काम सर्वात जास्त म्हणजे ९० किमीचे काम रखडले आहे. एमईपी कंपनीकडे हे काम होते. या कंपनीने बांधकामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या संदर्भात आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटलो. मुंबई गोवा महामार्गाचे रत्नागिरी जिल्ह्यातील काम एमईपी कंपनीकडून दुस-या कंपनीला दिले आहे. रखडलेले काम सुरु झाले आहे. येत्या पंधरा दिवसात पूर्ण ताकदीने काम सुरु होईल’.

‘१५ दिवसांत रत्नागिरीतील महामार्ग पूर्ण होणार’

दरम्यान, पुढे बोलताना ते म्हणाले, ‘रत्नागिरी जिल्ह्यातील काम एमईपीच्या नाकर्तेपणामुळे थांबले आहे. ते काम पूर्ण होण्यासाठी एक वर्ष लागेल. तसेच मुंबई गोवा महामार्गाचे संपूर्ण काम मे २०२१ मध्ये पूर्ण होईल’, असं ते म्हणाले. एवढंच नाही तर मुंबई – गोवा महामार्गाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काम येत्या मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल, असं देखील त्यांनी सांगितलं. या महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी रत्नागिरी जिल्ह्यातील महामार्गाच्या कामाकडे कंत्राटदाराने पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे काम रखडले होते. पण आता व्हॅन या नवीन कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत रत्नागिरी जिल्ह्यातील महामार्ग बांधणीचे काम पूर्ण ताकदीने पूर्ण होईल. मात्र मुंबई गोवा महामार्ग पूर्णपणे तयार होण्यास पुढील वर्षीचा मे महिना उजाडण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

कोकणासाठी ३०० कोटींची मागणी

दरम्यान, कोकणासाठी आम्ही उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री अजित पवार यांच्याकडे जास्तीत जास्त निधी मागणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. नियोजन मंडळाचे आराखडे सुमारे २०० कोटी रुपयांचे आहेत. नियोजन मंडळाला ३०० कोटी रुपये मिळावेत, अशाी मागणी वित्त मंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विशेष म्हणजे या बैठकीच्या संदर्भात माहिती देताना रत्नागिरी जिल्ह्याचे पालक मंत्री अनिल परब म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्याचा नियोजन आराखडा पुढच्या वर्षीसाठी तयार होणार आहे. त्याच्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी रत्नागिरीचे अधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती. रत्नागिरी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जो निधी अपेक्षित आहे आणि कोणत्या विभागावर किती निधी खर्च करायचा याचा ढोबळ आराखडा तयार करण्यात आल्याचे ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -