घरमुंबईपार्थ पवार माढा की मावळ मधून ?

पार्थ पवार माढा की मावळ मधून ?

Subscribe

अजित पवारांचे मौन

लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची तिसरी पिढी राजकारणात सक्रीय होत असल्याने त्या पिढीचा सर्व मार्ग सुकर व्हावा यासाठी पवार परिवार निवडणूक आखाड्यात उतरला आहे. यासाठी माढा की मावळ या दोन्ही मतदार संघाची चाचपणी करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पनवेल येथे काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. आणि त्यांना आघाडीच्या उमेदवारासाठी कामाला लागा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. मात्र बैठकीत बोलताना त्यांनी पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत भाष्य केले नाही. त्यामुळे पार्थ पवार माढा मधून की मावळ मधून लढणार यावर राष्ट्रवादीमध्ये संभ्रम आहे.

अजित पवार बुधवारी पनवेल येथे आले असता त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी आलो असल्याचे सांगितले. पार्थ पवार यांच्या उमेदवारीबद्दल अजित पवार यांनी आणखी दुजोरा दिलेला नाही. कुणाला कुठुन उमेदवारी द्यायची याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील घेणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार माढा मतदारसंघातून निवडणूक लढणार होते. मात्र एका घरातून किती जणांनी निवडणूक लढवायची, असे म्हणत त्यांनी माढातून माघार घेतली आहे. शिवाय पक्षातून पार्थ पवार यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी होत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तेव्हापासून पार्थ यांची उमेदवारी निश्चित असल्याचे मानले जात आहे.या बैठकीत अजित पवार यांनी सेना-भाजपवर टीका केली. भाजपकडून हवाई हल्ला करुन इतर मुद्द्यावरुन लोकांचे लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न करण्यात आले आहे. भाजपा सरकारच्या काळात बेरोजगारी वाढली, सिलिंडर महाग झाले, अतिरेकी कारवाया वाढल्या. शिवाय सीमेवर सर्वात जवान शहीद झाले, असा घणाघात त्यांनी यावेळी भाजपवर केला. धनगर समाजाच्या आरक्षणाची कागदपत्रे गायब होतात. संरक्षण खात्यातून फाईल गायब होत आहे. याचाच अर्थ चौकीदार चोर असल्याचे सिद्ध होते, असा आरोप अजित पवार यांनी केला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती करणार नाही, स्वबळावर लढणार, अशी घोषणा केली होती. पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या साक्षीने चौकीदार म्हणजेच पंतप्रधान चोर असल्याचेही ते बोलले होते. मात्र परत सत्तेला चिकटले, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांच्यावर अजित पवार यांनी हल्लाबोल केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -