रामदेव बाबाच्या पतंजली या कंपनीने भारतीय बाजारामध्ये आपल्या उत्पादनांनी ग्राहकांना चांगलंच जिंकून घेतलं आहे. बऱ्याच देशी गोष्टी बाजारात आणून इतर विदेशी वस्तूंना टक्कर दिली आहे. इतर घरगुती वस्तूंसह आता बऱ्याच कंपन्यांनी इलेक्ट्रॉनिक वाहन, स्टील आणि मोबाईल चिप उत्पादनांमध्येदेखील पतंजलीने उतरावं यासाठी विनंती केल्याचं पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी मिंट वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
अनेक कंपन्यांनी पतंजलीकडे केली विचारणा
पतंजलीने यासंदर्भात अजून कोणताही निर्णय घेतला नसून पतंजली केवळ भारतीय कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यात वा सहभागी होण्यासाठी उत्सुक असल्याचंही सांगितलं आहे.
पतंजलीचे व्यवसाय
“स्टील, मोबाईल चिप, इलेक्ट्रॉनिक वाहन या सर्वच क्षेत्रातील लोकांनी आमच्याकडे विचारणा केली आहे. पण आम्ही सगळेच करू शकत नाही. आमच्या व्यवसायाशी निगडीत आणि देशातील लोकांच्या गरजेसाठी जे काही करता येईल त्यामध्येच आम्ही काम करू. आमचा ‘स्वदेशी’ हा अजेंडा कायम राहील,” असंही बाळकृष्ण यांनी यावेळी सांगितलं.
गृहपयोगी वस्तूंच्या मुख्य व्यवसायाव्यतिरिक्त पतंजली सध्या रिटेल, शिक्षण, आरोग्यसेवा (आयुर्वेद) या व्यवसायात आहे. तसेच कंपनी शॅम्पू, टूथपेस्ट, बिस्किटं, नुडल्स, तांदूळ आणि गहू या वस्तूंच्या विक्रीमध्येदेखील अग्रेसर आहे. आता इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या बाबतीत पतंजली काय निर्णय घेणार हे लवकरच कळेल.