कल्याणच्या पत्री पुलाचे काम कधी होईल? याबाबत तारीख पे तारीख दिली जात आहे. त्यामुळे कल्याणकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मात्र कल्याणच्या छत्रपती शिवाजी गणेशोत्सव मंडळाने ‘पत्रिपुल नव्हे एप्रिल फुल’, असा देखावा साकरीत सरकारवर टीका केली आहे. कल्याणमध्ये पत्री पूलाचे, तसेच दुर्गाडी खाडी पूलाचे काम सुरु आहे. त्याचबरोबर वालधूनी नदीवरील शहाडच्या दिशेने पूलाचे काम सुरु आहे. हे पूल यापूर्वीच चार पदरी केले असते तर आता त्यांचे काम करावे लागले नसते. नागरीकाना वाहतूक कोंडीचा सामना करण्याची वेळ आली नसती. मात्र कल्याणकरांची कशाप्रकारे कोंडी होते हे मंडळाच्या देखाव्यातून साकारण्यात आले आहे. या समस्येकडे देखाव्याच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले आहे.
हेही वाचा – गड-किल्ल्यांपेक्षा तुमच्या मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्या – राज ठाकरे
देखाव्यात कल्ल्याणकरांच्या समस्यांचे चित्रण
कल्याण पश्चिमेतील टिळक चौकातील छत्रपती शिवाजी मंडळाचे ८३ वे वर्षे आहे. या मंडळाने कल्याणमधील वाहतूक कोंडीचा देखावा उभारुन सरकारचे लक्ष्य वाहतूक कोंडीच्या प्रश्नाकडे वेधले आहे. हा देखावा तयार करण्यासाठी २२ दिवसांचा कालवधी मंडळाच्या कार्यकर्त्यांना लागला. पुठ्ठ्याचा वापर करुन देखावा तयार करण्यात आला आहे. मंडळाची मूर्ती ही शाडूची आहे. मंडळाने पूर्णपणे पर्यावरण स्नेही गणेश देखावा तयार केला आहे. कल्याणच्या पत्री पूलाला एप्रिलफूल असे नाव दिले आहे. तसेच कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवॉक पादचाऱ्यांना चालण्यासाठी नाही. त्यावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण आहे. स्टेशन परिसरात गडदुल्ल्यांचा वापर असतो. स्कायवॉकवर वेश्या उभ्या असतात. महिलांना स्कायवॉकवरुन मार्गक्रमण करणे सुरक्षित नसते. या सगळ्या समस्या देखाव्यातून मांडून सरकारी व्यवस्थेचे लक्ष वेधण्यात आले आहे, असे मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र नामजोशी यांनी सांगितले. त्यामुळे या देखाव्याने कल्यांकरांचे लक्ष वेधून घेतले आहे.