ठाणे जिल्ह्यातील शहरांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून परिणामी उपलब्ध पाणीसाठा आणि मागणी यांच्यातील दरी रूंदावत आहे. यंदा ऑक्टोबर महिन्यापासूनच पाणी कपात सुरू असून सध्या तर १७ टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी कपात करण्यात आल्यामुळे यंदा जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत जेमतेम पुरेल इतका पाणीसाठा धरणात आहे. ठाणे जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येसाठी १४ वर्षांपूर्वी प्रस्तावीत करण्यात आलेल्या धरणांपैकी एकही धरण अद्यााप मार्गी लागलेले नाही. दरम्यानच्या काळात जिल्ह्यातील शहरांची लोकसंख्या मात्र कमालीची वाढली आहे. परिणामी पाणी पुरवठ्यातील ‘तूट’ हे ठाणेकरांची कायमचे दुखणे ठरणार आहे. विशेष म्हणजे निवडणुकीच्या राजकीय धुळवडीत मग्न असणाऱ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना त्याविषयी अजिबात गांभीर्य दिसत नाही. ठाण्याची पाणी समस्या कशी आणि कधी सोडविणार याबाबत सत्ताधारी पक्षाचे नेतेही मूग गिळून गप्प आहेत.
जाहीरनाम्यांमध्ये कोरड्या आश्वाासनांचा अभाव
ठाणे जिल्ह्यातील वाढत्या शहरांसाठी मुरबाड आणि शहापूर या दोन तालुक्यात अनुक्रमे काळू आणि शाई ही दोन धरणे तातडीने बांधावीत, अशी शिफारस माधवराव चितळे समितीने १४ वर्षांपूर्वी शासनाला सादर केलेल्या अहवालात केली आहे. याकाळात शहरांची लोकसंख्या जवळपास तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढली आहे. मात्र एकाही धरणाचे काम अद्यााप मार्गी लागू शकले नाही. त्यामुळे भविष्यात वाढत्या शहरांची पाण्याची गरज कशी भागवावी, असा प्रश्न जलसंपदा विभागाला पडू लागला आहे. गेल्या वर्षीपर्यंत पाणी उचल करणारी प्राधिकरणे (एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, स्टेम) त्यांना दिलेल्या मंजूर कोट्यापेक्षा अधिक पाणी उचलून शहरांची तहान भागवत होते. मात्र त्यामुळे एकूण जलसाठ्यात गंभीर तूट येऊ लागली. त्यावर उपाय म्हणून यंदा पाटबंधारे विभागाने सर्व संबंधित प्राधिकरणांना मंजूर कोट्याइतकेच पाणी उचलण्याची तंबी दिली. त्यामुळे यंदा १५ जुलैपर्यंत पाणीसाठा पुरेल, अशी माहिती पाटबंधारे विभागातील सूत्रांनी दिली. नवीन जलस्त्रोत न शोधल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊशकेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
राजकीय उदासिनता
सध्या नवे ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदरपासून बदलापूरपर्यंत भीषण पाणी टंचाई भेडसावत आहे. या भागातील बहुमजली इमारतींना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांना टँकरपोटी लाखो रूपये मोजावे लागत आहेत. पुरेसा पाणी पुरवठा होऊ शकणार नसेल, तर कशाला स्मार्ट सिटीची स्वप्ने पहायची असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. खरेतर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या या प्रश्नावर जाहीर चर्चा होणे गरजेचे आहे. मात्र सर्वच राजकीय पक्षांनी याविषयी उदासिनता दाखवली आहे.
वाचा – ठाणे जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट?