मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर मनसे कार्यकर्ते चांगलेच भडकडे. त्यांनी जागोजागी बॅनर लावून राज ठाकरेंना समर्थन दर्शवले. शिवाय २२ ऑगस्ट रोजी ईडी कार्यालयात राज ठाकरेंसोबत जाण्याचा निर्यणही मनसे कार्यकर्त्यांनी घेतला आहे. मात्र अशावेळी राज ठाकरे यांनीदेखील मनसैनिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच तुम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला जाईल, तरीही तुम्ही शांतच रहा. शिवाय कुणीही ईडीच्या कार्यालयाजवळ जमू नये, अशी विनंतीही राज ठाकरे यांनी केली आहे. तसेच योग्य वेळ आल्यावर आपण बोलून, असा सुचक इशाराही त्यांनी दिला आहे. काय म्हटलंय राज ठाकरेंनी…
माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना,
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून तुमच्या माझ्यावर अनेक केसेस झाल्या, आणि प्रत्येक वेळेस आपण सर्वांनी तपास यंत्रणांचा आणि न्यायालयाच्या नोटीसांचा आदर केला आहे, त्यामुळे आपण ह्या अंमलबजावणी संचानालयाच्या(ईडी) नोटिसीचा देखील आदर करू. इतक्या वर्षात आता तुम्हाला आणि मला केसेस आणि नोटिसांची सवय झाली आहे; म्हणूनच माझी तुम्हा सर्वाना विनंती आहे की येत्या २२ ऑगस्टला शांतता राखा. सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होणार नाही आणि सामान्य जनतेला त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्या. तुम्हाला डिवचयचा प्रयत्न होणार पण तरीही तुम्ही शांत रहा.
तसेच माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो माझ्यावर तुमच्या सर्वांच्या असलेल्या प्रेमाची मला जाणीव आहे पण तरीही विनंती की कुठल्याही पदाधिकाऱ्याने अथवा महाराष्ट्र सैनिकांनी ईडीच्या कार्यालयाजवळ येऊ अथवा जमू नये. आणि बाकी ह्या विषयावर मला जे बोलायचं आहे ते मी योग्य वेळी बोलेनच.