मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी कृष्णकुंजवर नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला मनसेचे नेते आणि काही पदाधिकारी उपस्थित आहेत. ‘राज ठाकरे आमच्यासोबत रहातील असे वाटत नाही’, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकांपर्यंत मनसेला महागठबंधनमध्ये स्थान नसल्याचं स्पष्ट केलं होतं. याच पार्श्वभूमीवर अन्य पर्यायांचा विचार करण्यासाठी ही विशेष बैठक बोलावण्यात आल्याचं कळत आहे. सूत्रांनुसार, सदर बैठकीत मनसे राष्ट्रवादीसमोर मुंबई आणि ठाणे येथे ३ उमेदवार उभे करण्याच्या तयारीत असून, त्या ३ विभागात महाआघाडीने आपला उमेदवार उभा करू नये, असा प्रस्ताव ठेवणार आहे.
मध्यंतरी राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जवळीक वाढते आहे, असे आडाखे बांधले जात होते. मात्र, अशातच शरद पवारांनी निवडणुकांपर्यंत राज ठाकरे आमच्यासोबत राहतील असं वाटत नाही, असं वक्तव्य केलं. शरद पवार यांनी स्वत:च महागठबंधनमध्ये मनसेला स्थान नसल्याचं सांगितल्यामुळे, हे दोन पक्ष एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम लागला. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांनीही काही दिवसांपूर्वी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. ‘मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात येत्या निवडणुकीत आघाडी होणार नाही’, असा दावा अहिर यांनी केला आहे. ‘मुंबईतली कोणतीही जागा मनसेसाठी सोडण्याचा प्रश्नच येत नाही’, असंही अहिर यांनी थेट म्हटलं होतं.