“आचरेकर सरांनी मला नेहमी चांगल्या गोष्टी शिकवल्या. याच कारणामुळे मी घडलो आणि माझी क्रिकेटची कारकीर्द यशस्वीरित्या पार पाडली. त्यावेळी त्यांनी दिलेले कोचिंग किती छान होतं.” असे खेळाडू सचिन तेंडुलकर याने वक्तव्य केले आहे. शोकसभेत रमाकांत आचरेकर यांना श्रद्धांजली देत सचिनने आचरेकर सरांच्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमात सचिनबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्याचा मित्र आणि खेळाडू विनोद कांबळीही उपस्थित होता.
काय म्हणाला सचिन
“मी जो काही घडलो ते फक्त आचरेकर सरांमुळेच. त्यावेळी त्यांचे कोचिंग छान होते त्यामुळे मला योग्य दिशा मिळाली. मी बॅटीचे हॅंडल खालच्या बाजूने धरत असे, सरांनी ते बघून माझी चुकी सुधरली आणि मला ग्रीप वर धरायला सांगितले. सरांनी सांगितल्या प्रमाणे मी खेळलो मात्र सरांना पाहिजे तसा रिझल्ट मिळत नव्हता. त्यावेळी त्यांनी मला बोलावून घेतले. ग्रीप कशी पकडावी याचे ज्ञान मला दिले त्यामुळेच मी चांगली फलंदाजी करु शकलो.” असे सचिन म्हणाला.
Mumbai: Sachin Tendulkar & NCP chief Sharad Pawar at Shivaji Park Gymkhana to pay tribute to cricket coach Ramakant Achrekar who passed away on 2 January. #Maharashtra pic.twitter.com/VcQl1mhoeb
— ANI (@ANI) January 10, 2019
अशा शिक्षकाची मुंबईला गरज
या शोकसभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनीही आठवणी सांगितल्या. “माझी खात्री आहे की त्यांनी चांगली मुले घडवली. मुले तयार करणे हे एक उत्कृष्ठ शिक्षकाचे काम आहे जे त्यांनी केले. या क्षेत्राला त्यांनी दिलेले योगदान हे मोठे आहे. सध्या क्रिकेटची अवस्था अस्वस्थ करणारी आहे. या वेळेस मुंबईला अशाच मार्गदर्शकाची गरज आहे. कार्यक्रमाला येण्यापूर्वी सचिनने आचरेकर सरांचा वारसा पुढे चालू ठेवणार असल्याचे सांगितले. सध्या याची गरज आहे.” – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार