वसई तालुक्यातील अनेक रस्त्यांच्या कडेला शेकडो बेवारस आणि भंगार गाड्या पडून आहेत. या गाड्यांचा वापर गर्दुल्यांकडून लपण्यासाठी केला जात आहे. रात्रीच्या वेळी गर्द पिण्यासाठी आणि लपण्यासाठी या गाड्यांचा वापर चोरटे आणि गर्दुल्यांकडून केला जात आहे.
तालुक्यातील विरार, नालासोपारा, वसईरोड आणि वसई या चार शहरांच्या मुख्य रस्त्यांच्या कडेला शेकडो भंगार आणि बेवारस वाहने गंजून सडत पडली आहेत. या वाहनांमध्ये गर्दुले आणि चोरट्यांनी आपला अड्डा बनवला आहे. या अड्ड्यातून रात्रीच्यावेळी अंधाराची संधी साधून ते नागरिकांना लुटत असतात. नशा भागवण्यासाठी गर्दुले लूटमार करत असल्याच्या तक्रारी अनेक पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तसेच या भंगार आणि बेवारस गाड्यांवर कचरा टाकण्यात येत असल्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या भंगार गाड्यांनी सर्वत्र रस्ता व्यापल्यामुळे वाहतुकीचीही कोंडी होत आहे. या गाड्यांकडे, पोलीस, महापालिका आणि वाहतूक पोलिसांनीही दुर्लक्ष केले आहे.
भंगार गाड्या ठेवण्यासाठी लवकरच वाहतूक पोलिसांना जागा उपलब्ध करून देण्यात येईल.
– बळीराम पवार, आयुक्त, वसई विरार महापालिका
पालिकेने जागा दिल्यास ही भंगार वाहने एका ठिकाणी ठेवता येतील.
-संपतराव पाटील, पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग