मराठी वृत्तपत्र सृष्टीमध्ये अग्रलेखांचे बादशहा अशी बिरुदावली असणारे ‘दैनिक नवाकाळ’चे ज्येष्ठ संपादक तथा लेखक आदरणीय नीलकंठ (भाऊ) यशवंत खाडिलकर यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. गिरगाव येथील ‘नवाकाळ’ कार्यालय येथे दुपारी १२ ते २ यादरम्यान त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून आज दुपारी ३ वाजता मरीन लाईन्स येथील चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांचा अंत्यसंस्कार विधी केले जाणार आहेत.
खाडिलकर यांच्याविषयी थोडक्यात…
नीळकंठ खाडिलकर नवाकाळचे अनेक वर्ष संपादक होते. या काळात महत्त्वाच्या घडामोडींवर त्यांनी अग्रलेखांमधून भाष्य केले. खाडिलकर हे एक उत्तम मुलाखतकार होते. त्यांनी घेतलेल्या गोळवलकर गुरुजी आणि सत्य साईबाबा यांच्या मुलाखती अतिशय गाजल्या. तसेच वर्तमान सामाजिक-राजकीय परिस्थितीचे अभ्यासू आणि विवेकी विवेचन वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं. दैनिक नवाकाळ या वृत्तपत्राचे संपादक म्हणून खाडिलकर यांनी जवळपास २७ वर्षे काम केलं. संपूर्ण अर्थशास्त्र हा विषय घेऊन ते बी.ए. ऑनर्स झाले होते. ज्येष्ठ नाटककार आणि ‘केसरी’चे भूतपूर्व संपादक कृ. प्र. खाडिलकर यांचे ते नातू होते. ते ‘ दैनिक संध्याकाळ’ या नावाचे सायंदैनिकही काढत असत. निळूभाऊ खाडिलकरांचं ‘हिंदुत्व’ हे पुस्तक समीक्षकांच्या आणि वाचकांच्या पसंतीस उतरलं.
आपल्या तेज लेखणीने गेली ६ दशके सातत्याने अन्यायाविरोधात अग्रलेखांच्या माध्यमातून वाचा फोडणारे निळूभाऊ आज काळाच्या पडद्या आड गेले आहेत. अग्रलेख, प्रॅक्टिकल सोशिलीसम आणि आपल्या भारधार वक्तृत्वाने निळूभाऊनी नवाकाळची कीर्ती साता समुद्रापार पोहोचवली. तसेच सामान्य जनतेचा तोफखाना अशी निळूभाऊंची ओळख.
हेही वाचा – मातोश्री ‘चाणक्य’ बदलतेय का?