घरमुंबईपी. चिदंबरम हिंदू दहशतवाद शब्दाचे 'जनक'!

पी. चिदंबरम हिंदू दहशतवाद शब्दाचे ‘जनक’!

Subscribe

'हिंदू दहशतवाद' या शब्दाचे जनक तत्कालीन गृहमंत्री चिदंबरमच होते. त्या विकृत कल्पनेचा त्यावेळी बळी ठरलेले अमित शाह, नरेंद्र मोदी हे आज दिल्लीचे सूत्रधार आहेत, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून पी. चिदंबरम यांच्यावर करण्यात आली आहे.

‘हिंदू दहशतवाद’ या शब्दाचे जनक तत्कालीन गृहमंत्री चिदंबरमच होते. त्या विकृत कल्पनेचा त्यावेळी बळी ठरलेले अमित शाह, नरेंद्र मोदी हे आज दिल्लीचे सूत्रधार आहेत, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून पी. चिदंबरम यांच्यावर करण्यात आली आहे. सध्या सगळीकडे पी. चिदंबरम यांच्या अटकेच्या वेळी घडलेल्या नाट्यमय घडामोडींची चर्चा असून, आता सामनातून देखील त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. चिदंबरम गृहमंत्री असताना अनेक राजकीय कार्यकर्त्यांचे स्वातंत्र्य याच पद्धतीने हिरावून घेतले होते. त्यासाठी सीबीआयसारख्या संस्थांचा वापर झालाच होता, अशी टीका देखील करण्यात आली आहे.

काय आहे सामना अग्रलेखात 

  • पी. चिदंबरम यांना अखेर अटक झाली आहे. त्यांच्या अटकेच्या निमित्ताने दिल्लीत जे नाट्य ‘सीबीआय’ ने घडवले त्याची खरेच आवश्यकता होती का? एका आर्थिक घोटाळ्यात चिदंबरम यांना अंतरिम जामीन दिल्ली हायकोर्टाने नाकारला. सुप्रीम कोर्टाने जामिनावर तत्काळ सुनावणी करण्यास नकार दिला. त्यानंतर हायकोर्टाच्या आवारातून चिदंबरम अदृश्य झाले, ते ७२ तासांनंतर काँग्रेस मुख्यालयात प्रकट झाले. आपण निर्दोष असल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
  • चिदंबरम तेथून स्वतः च्या घरी पोहोचले व सीबीआयने त्यांच्या अटकेसाठी जे नाट्य केले ते संपूर्ण देशाने पाहिले. चिदंबरम हे ७२ तास दिल्लीतच होते, पण सीबीआय त्यांना शोधू शकली नाही. ज्या तपासयंत्रणा चिदंबरमसारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीला शोधू शकल्या नाहीत, त्या यंत्रणा गुन्हेगार किंवा अतिरेक्यांचा कसा शोध घेणार, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो.
  • ७१ तासात चिदंबरम कुठे होते, हे पोलीस किंवा इतर तपासयंत्रणा शोधू शकत नसतील तर ते त्यांचे अपयश म्हणावे लागेल. चिदंबरम हे काँग्रेसचे नेते आहेत. चिदंबरम देशाचे माजी गृहमंत्री आणि अर्थमंत्री आहेत. असतील हो, पण त्याचा इथे काय संबंध? ते कोणीही असतील, पण कायद्याच्या वर नाहीत.
  • ३५०० कोटी रुपयांचा एअरसेल मॅक्सिस करार आणि आयएनएक्स मीडिया व्यवहारात ३०५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत गैरव्यवहार झाल्याचे हे प्रकरण आहे. नियमबाह्य गोष्टी या व्यवहारात झाल्याचे उघड दिसत आहे. फक्त ४.६ कोटी रुपयांची परवानगी असताना परकीय गुंतवणूक ३०५ कोटींपर्यंत पोहोचली हे गौडबंगाल काय, ते चिदंबरम आणि त्यांचे दिवटे चिरंजीव कार्ति यांनाच माहीत.
  • काँग्रेस मुख्यालयात प्रकट झालेल्या चिदंबरम यांनी सांगितले की, ‘आयएनएक्स घोटाळ्यात मी आरोपी नाही.’ चिदंबरम यांचे हे म्हणणे असेल तर गेले सहा महिने ते ‘जामीन’ घेऊन का वावरत होते व आरोपी नसताना अटक करून न्यायला तपासयंत्रणांना वेड लागले आहे काय? ‘‘स्वातंत्र्य हा लोकशाहीचा मूलमंत्र आहे. अशा वेळी जीवन आणि स्वातंत्र्य यापैकी मला काही निवडण्यास सांगितल्यास मी स्वातंत्र्याला प्राधान्य देईन,’’ असे वक्तव्य चिदंबरम यांनी काँग्रेस मुख्यालयात केले.
  • चिदंबरम हे कोणत्या स्वातंत्र्याची भाषा करत आहेत? ‘आयएनएक्स’ व ‘एअरसेल’ व्यवहार म्हणजे ‘मिठाचा सत्याग्रह’ किंवा ‘गांधींची दांडीयात्रा’ नव्हे. हा काही स्वातंत्र्यसंग्राम नाही. त्यामुळे या प्रकरणास नैतिकता व लोकशाही मूल्यांचा मुलामा देण्याची गरज नाही.
  • चिदंबरम गृहमंत्री असताना अनेक राजकीय कार्यकर्त्यांचे स्वातंत्र्य याच पद्धतीने हिरावून घेतले होते व त्यासाठी सीबीआयसारख्या संस्थांचा वापर झालाच होता. ‘हिंदू दहशतवाद’ या शब्दाचे जनक तत्कालीन गृहमंत्री चिदंबरमच होते व त्या विकृत कल्पनेचा त्यावेळी बळी ठरलेले अमित शहा, नरेंद्र मोदी हे आज दिल्लीचे सूत्रधार आहेत. प्रज्ञासिंह ठाकूर संसदेत पोहोचल्या आहेत. हा काळाने घेतलेला सूड आहे.
  • चिदंबरम मात्र त्याच ‘सी.बी.आय.’च्या कोठडीत पोहोचले. चिदंबरम हे निष्णात वकील आहेत. राजशकट कसे चालते व हलते याचा अनुभव त्यांना आहे. आहे त्या परिस्थितीस सामोरे जाणे व स्वतःचा बचाव करत राहणे हाच उपाय आहे. काँग्रेसचा क्षीण झालेला आवाज काही दिवसांत मूक होईल. लोक चिदंबरम यांना विसरून जातील.

हेही वाचा – 

Vadapav Day: जाणून घ्या कसा झाला ‘मुंबईच्या वडापावचा जन्म’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -