बेघर झालेल्या वृद्धांना निवारा देण्यासाठी जागा आणि घर मिळत नव्हते, अशावेळी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन शहरात ओस पडलेल्या समाजमंदिरांमध्ये वृद्धाश्रम सुरु करण्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरविली आहे. वृद्ध आणि बेघर नागरिकांसाठी शासनाने अनेक योजना सुरु केल्या आहेत मात्र त्यांच्यासाठी चांगली राहण्याची व्यवस्था करणे हि फार कठीण बाब होती. यासाठी शहरातील समाजसेवक सत्यवान जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.
समाजमंदिरांमध्ये वृद्धाश्रम स्थापन
उल्हासनगर शहरात अनेक समाजमंदिर बनविण्यात आलेले आहेत, काही समाजमंदिरांमध्ये चांगल्या प्रकारची सामाजिक कार्ये होत आहेत तर काही ओस पडलेले आहेत. अशा ओस पडलेल्या आणि जीर्ण झालेल्या समाजमंदिरांचा शोध घेऊन त्यांची डागडुजी करून, राहण्यायोग्य बनवून, तेथे वृद्धाश्रम स्थापन करण्याचे काम जगताप यांनी काही महिन्यांपूर्वी सुरु केले होते. उल्हासनगर- १ आणि उल्हासनगर- ३ येथे अशी वृद्धाश्रमे सुरु झाली आहेत.
अनेक संघटनांनी घेतला पुढाकार
उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर शहरातील जवळपास १०० वृद्ध व्यक्ती या आश्रमांमध्ये दाखल झाले आहेत. आता अनेक सामाजिक संघटनांनी वृद्धाश्रमांना मदत करण्यास सुरु केली आहे यात वालधुनी उल्हास बिरादरी, वज्र संघटना, वृक्ष फाऊंडेशन, युथ ऑफ टुडे अंबरनाथ टीम, वृषाली फाउंडेशन बदलापूर या संघटनांचा समावेश आहे .