राज्यात एसएससी विद्यार्थ्यांची शालांत परीक्षा सुरु असताना १५ मार्च रोजीचा विज्ञान-१ तर १८ मार्चला विज्ञान-२ तसेच २० मार्चचा समाजशास्त्र विषय अशा तीन प्रश्नपत्रिका भिवंडी शहरात फुटल्याच्या तीन वेगवेगळ्या घटना समोर होत्या. याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी यापूर्वीच वजीर हफिजूर रहेमान शेख (४० रा. वेताळपाडा ) याला तर आज इंतेकाब निषाद पटेल (३२) आणि अंबर अफरोज अन्सारी (२९) याला अटक केली आहे. अटक केलेल्या शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांची संख्या तीनवर गेली आहे. सध्या राज्यात दहावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा सुरु आहे. यावर्षी राज्यामध्ये कॉपी, पेपर फुटणे असे प्रकार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तरी देखील दहावीच्या विद्यार्थ्यांचा पेपर फुटला. पेपर फुटल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पालकांनी या घटनेनंतर शिक्षण विभाग आणि बोर्डावर नाराजी व्यक्त केली आहे.
२९ मार्च पर्यंत कोठडी
एसएससी विद्यार्थ्यांची शालांत परीक्षा सुरु असताना १० वीच्या लागोपाठ तीन पेपर फुटीप्रकरणी भिवंडी शहर आणि नारपोली पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. भिवंडी शहर पोलिसांनी यापूर्वीच वजीर हफिजूर रहेमान शेख, या कोचिंग क्लास शिक्षकाला पोलीस कोठडीत डांबले आहे. आज २३ मार्च रोजी अंबर अफरोज अन्सारी या कामतघर येथील काकतीया इंगलीश स्कुलच्या शिक्षकास बेड्या ठोकल्या आहे. तर नारपोली पोलिसांनी शनिवारी महापोली येथील इंतेकाब निषाद पटेल यास अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
विद्यार्थिनींवर कारवाईची टांगती तलवार
या तिघांनी कोचिंग क्लासच्या माध्यमातून तीन विद्यार्थिनींना मोबाईल व्हाट्सऍपद्वारे समाजशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका कॉपी करण्यासाठी उपलब्ध करुन दिल्याचे उघडकीस आले आहे. मात्र यातील तीन विद्यार्थिनींवर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार कायम असल्याने त्यांच्यावर लवकरच कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव करीत आहे.