गोवर आणि रुबेला या आजाराचं वाढतं प्रमाण कमी करण्यासाठी मुंबईसह महाराष्ट्रात गोवर- रुबेला लसीकरण मोहीम राबवली जात आहे. गोवर-रुबेला या गंभीर आजारांचे निर्मूलन करण्यासाठी राज्यात ९ महिने ते १५ वर्षांखालील बालकांसाठी २७ नोव्हेंबर २०१८ पासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. त्यात आतापर्यंत मुंबईत ६७ टक्के मुलांचं लसीकरण पूर्ण झालं आहे, पण अजूनही मुंबईतील ६१ खासगी शाळांनी या मोहिमेला तीव्र विरोध केला असल्याचं समोर आलं आहे.
बालमृत्यू दरानुसार गोवर-रुबेला या आजारामुळे ३ टक्के मुलांचा जीव जातो, तर त्याच्या तुलनेत मलेरियामुळे फक्त १ टक्के मुलांचा जीव जात असल्याचं पालिका प्रशासन अधिकार्यांकडून सांगण्यात आलं आहे. म्हणजे गोवर – रुबेला हा आजार किती गंभीर आहे याचा आपण विचार करू शकतो.
गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेवरून पसरलेल्या अफवांमुळे अनेक शाळांनी या लसीकरणाला सुरुवातीपासूनच विरोध केला. तरीही, अनेक पालिका आणि खासगी शाळांमधील मुलांचं लसीकरण केलं गेलं आहे. त्यानुसार, शुक्रवारपर्यंत १९ लाख ६८ हजार मुलांना गोवर-रुबेलाची लस देण्यात आली आहे, पण ६१ खासगी शाळांनी या मोहिमेला विरोध करत ही लस आपल्या शाळेतील मुलांना दिली जाणार नाही, असं ठणकावून सांगितलं आहे.
या ६ वॉर्डातील शाळा करतात विरोध –
मुंबईच्या एम पूर्व, एल वॉर्ड, पी नॉर्थ, बी, ई, एच ईस्ट आणि एच वेस्ट या वॉर्डमधील शाळा विरोध करत आहेत. गोवर आणि रुबेलाचे लसीकरण मुलांना करणं गरजेचं असल्याचं माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार, ज्या शाळा मुलांना लसीकरण देण्यास नकार देत आहेत, त्या शाळेतील शिक्षकांचं, मुख्याध्यापकांचं समुपदेशन करण्याचाही प्रयत्न केला गेला, पण त्या शाळा लसीकरण करून घेण्यास सरळ नकार देत असल्याचं या एमआर मोहिमेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रशेखर चिपळूणकर यांनी सांगितलं आहे.
‘आतापर्यंत ६१ खासगी शाळांकडून एमआर लसीकरणाला विरोध केला जात आहे. या शाळांतील शिक्षकांशी बोलणं झालं आहे. ज्या शाळांमध्ये अपेक्षित होतं एमआर लसीकरण करणं, त्या शाळांमधील मुलांचंही लसीकरण झालेलं नाहीय. प्रत्येक शाळेतील किमान १००० मुलं पकडली तर किमान ५ ते ६ लाख मुलांचं लसीकरण झालेलं नाही. कारण, ही मुलं शाळेतच उपलब्ध नव्हती. ही मुलं स्वत:ही लसीकरण घेत नाहीत आणि बाहेर राबवणार्या लसीकरण मोहिमेंतर्गतही मुलं लसीकरण घेत नाहीत. त्यामुळे, अजूनही या लसीकरणाबाबत खूप मोठा गैरसमज आहे. याविषयी वारंवार शिक्षकांना सांगूनही या शाळांकडून लक्ष दिलं जात नाही.’डॉ. चंद्रशेखर चिपळूणकर , सहाय्यक आरोग्य अधिकारी ,