उल्हासनगर येथिल गांधीनगर परिसरात नादुरुस्त शौचालयामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. विशेषतः महिलांची कुचंबणा होत आहे. शासनाच्या ‘‘हगणदारीमुक्त’ आणि ‘स्वच्छ भारत’ अभियानाची लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून उघडउघड खिल्ली उडवली जात असल्याचा आरोप मातंग संघर्ष समितीने केला आहे .
उल्हासनगर-2 येथील प्रभाग क्रमांक 7 मध्ये खेमानी रोड, गांधीनगर परिसरात महानगरपालिकेने 10 लाख रुपये खर्च करून 10 सीटर शौचालय बनविले होते. 2016-17 मध्ये या शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आणि सार्वत्रिक निवडणुकीच्या अगोदर त्याचे उद्घाटन करण्यात आले. काही दिवस नागरिकांनी या शौचालयाचा वापर केला. मात्र त्यानंतर हे शौचालय तुंबू लागले. सांडपाणी आणि घाण शौचालयाभोवती जमू लागली. शौचालयाचे आऊटलेड तांत्रिकदृष्ठ्या सदोष असल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिक नागरिक आणि मातंग संघर्ष समितीने मनपाकडे वारंवार तक्रारी केल्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. सध्या दुरूस्तीअभावी या शौचालयाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना दूरच्या ठिकाणी असलेल्या शौचालयास जावे लागते. विशेषतः महिला वर्गाची कुचंबणा होत असून काहीजण झाडाच्या आडोश्याला किंवा अन्य ठिकाणी उघड्यावर शौचास बसतात .
या संदर्भात मातंग संघर्ष समितीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर मरसाळे, गजानन बामनकर, नरेश गायकवाड, सागर पगारे, पप्पू जाधव, संतोष खत्रे, सुरेश सौदागर यांनी काल मनपा आयुक्त गणेश पाटील यांची भेट घेऊन या समस्येबाबत चर्चा केली. यावेळी लवकरात लवकर ही समस्या सोडवण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. आम्हाला आतापर्यंत अनेकदा आश्वासने देण्यात आली आहेत. मात्र प्रत्यक्षात काही काम झालेले नाही. जर आयुक्तांनी आपला शब्द पाळला नाही तर 20 ऑगस्टपासून मनपा मुख्यालय समोरच आमरण उपोषण करणार, असा इशारा ज्ञानेश्वर मरसाळे यांनी दिला आहे