मुंबईच्या तापमानात होणाऱ्या चढ-उतारामुळे स्वाईन फ्लू या आजाराचा धोका वाढला असून मार्च ते एप्रिल या दोन महिन्यादरम्यान या आजाराने दोन बळी घेतले आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून स्वाईन फ्लूने मुंबईत पाय पसरायला सुरूवात केली. त्यानुसार, आतापर्यंत १३४ रुग्णांची नोंद करण्यात आली. तर, दोन मृत्यूंची ही नोंद करण्यात आली आहे. आग्रीपाडा आणि माझगाव या दोन परिसरातील महिलांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. मार्च महिन्यात हे मृत्यू झाले होते. पण, मृत्यू नोंदणी समितीने या मृत्यूंचा अहवाल दिला नव्हता. या समितीने एप्रिल महिन्यात दिलेल्या अहवालानुसार हे दोन्ही मृत्यू स्वाईन फ्लूमुळे झाले असल्याचं स्पष्ट झालं आहे.
आग्रीपाडा येथे राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेला अचानक ताप, खोकल्याचा त्रास सुरू झाला. त्यांच्यावर उपचार सुरू होते. या महिलेच्या काही तपासण्या केल्यानंतर तिला स्वाईन फ्लू असल्याचं निदान झालं. पण, काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. तर, दुसऱ्या केसमध्ये माझगाव येथे राहणाऱ्या ६५ वर्षीय महिलेला स्वाईन फ्लूची लागण झाली असल्याचं समोर आलं होतं. त्यांच्यावर उपचार ही सुरू होते. सोबतच त्यांना डायबिटीस असल्याचं सांगण्यात आलं. पण, अचानक या महिलेची प्रकृती बिघडली आणि स्थानिक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे.
जानेवारीपासून आतापर्यंत २ जणांचा स्वाईन फ्लूने बळी गेला. एप्रिल महिन्यात या रुग्णांचा स्वाईन फ्लूमुळेच मृत्यू झाल्याचं मृत्यू नोंदणी समितीने स्पष्ट केलं आहे. तर, आतापर्यंत एकूण १३४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
– डॉ. पद्मजा केसकर, कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई महापालिका
राज्यानंतर मुंबईत २ बळी
नागपूर, नाशिकनंतर आता मुंबईतही स्वाईन फ्लूने बळी घेतला आहे. मार्च महिन्यामध्ये मुंबईत स्वाईन फ्लूमुळे दोन मृत्यू झाले आहेत. जानेवारी ते एप्रिल राज्यात स्वाईन फ्लूमुळे १२० जणांचा जीव गेला आहे. तर, १३०० नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत २०१८ मध्ये स्वाईन फ्लूच्या एकाच मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
स्वाईन फ्लूची लक्षणं
- ताप
- घसा खवखवणं
- अंगदुखी
- थकवा
- अतिसार, उलट्या
- अचानक तोल जाणं
- श्वसनाचा त्रास
- मुलांची त्वचा निळसर होणं, अंगावर पुरळ येणं
- स्वाईन फ्लूला प्रतिबंध कसा कराल
हे करा
- सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळावं
- खोकताना, शिंकताना रुमालाचा वापर करा
- नाक आणि तोंडावर मास्क बांधावा
- हात वारंवार साबणाने धुवा
- भरपूर पाणी प्या
- संतुलित आहार घ्या