मुलुंड येथील प्लस्टिक व्यापाऱ्याचे लाखो रुपये घेऊन बेपत्ता झालेल्या नोकराचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत भिवंडीच्या काल्हेर गावातील खाडीत मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नारपोली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पूर्व तपासणीसाठी शासकीय रुग्नालयता पाठ्वण्यात आला आहे. अज्ञात मारेकऱ्यांनी या नोकराजवळ असलेली रोकड लुटून त्याची हत्या केल्याची शक्यता असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध लूट आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रसाद तिवारी (३७) असे हत्या कऱण्यात आलेल्या नोकराचे नाव आहे. ठाण्यातील पोखरण रोड येथे राहणारा प्रसाद हा मुलुंड येथील प्लास्टिक व्यापारी दीपक संघवी यांच्याकडे मागील ८ वर्षांपासून नोकरीला होता.
८ लाखांच्या रोकजसह लंपास
संघवी हे मुंबई, ठाणे, आदी परिसरात प्लास्टिक कारखान्यांना कच्या मालाचा पुरवठा करतात. विश्वासू आणि प्रामाणिक असलेल्या प्रसादवर मालकाने प्लस्टिकच्या कारखानदारांकडून कच्च्या मालाचे पैसे जमा करण्याची जबाबदारी सोपवली होती. ६ मार्च रोजी प्रसादने काही कारखानदारांकडून कच्च्या मालाचे सुमारे ७ ते ८ लाख रुपयांची रोकड जमा केली केली आणि तेथून तो बेपत्ता झाला. मालकाने त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा मोबाईल फोन बंद लागत असल्यामुळे मालकाने त्याचा घरी देखील संपर्क साधला. मात्र तो घरी देखील आला नसल्याचे समजताच मालक संघवी यांनी दुसऱ्या दिवशी मुलुंड पोलीस ठाण्यात प्रसादाची बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
चावीच्या आधारे पटली ओळख
दरम्यान नारपोली पोलिसांना ९ मार्च रोजी रात्री ८ वाजण्याचा सुमारास भिवंडीतील काल्हेर येथे असलेल्या खाडीत एका इसमाचा प्लास्टिक गोणीत कुजलेला मृतदेह मिळून आला होता. या मृतदेहाजवळ पोलिसांना फक्त मोटारसायकलची चावी मिळून आली होती. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी नारपोली पोलिसाकडे मृत इसमाजवळ सापडलेल्या मोटारसायकलच्या चावीचा आधार होता. नारपोलीस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी ठाणे मुंबई या ठिकाणी बेपत्ता झालेल्या इसमाचा शोध घेत असताना मुलुंड येथून एक इसम बेपत्ता झाला असल्याची माहिती मिळून आली. नारपोली पोलिसांनी मुलुंड पोलिसांकडे संपर्क साधला असता मुलुंड मधून बेपत्ता झालेला प्रसाद याचे वर्णन काही प्रमाणात मूर्त इसमाशी जुळत होते. खात्री करण्यासाठी नारपोली पोलिसांनी प्रसादच्या मोटारसायकलचा शोध घेतला असता प्रसादाची मोटारसायकल मुलुंड परिसरात मिळून आली. नारपोली पोलिसांना मिळालेली मोटारसायकलची चावी त्या मोटारसायकलला लावून बघितली असता मृतदेहाजवळ सापडलेली चावी मुलुंड मध्ये सापडलेल्या मोटारसायकलीशी जुळली आणि तेथूनच मृतदेह हा प्रसादचा असल्याची खात्री झाली. नारपोली पोलिसांनी प्रसादाचे नातेवाईक आणि मालकाला बोलावून मृतदेह प्रसादच असल्याची खात्री केली.
प्रसाद यांच्याजवळ असलेली रोकड लुटण्याच्या उद्देशातून अज्ञात मारेकऱ्यांनी प्रसादाचे अपहरण करून त्याची हत्या केली असल्याची शक्यता नारपोली पोलीस ठाण्याचे पो.नि. भालेराव यांनी आपल महानगरशी बोलताना व्यक्त केली. या प्रकरणी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध लूट आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मारेकऱ्यांचा शोध सुरु आहे.