बीएएमएस, बीएचएमएस आणि बीयूएमएस यासारख्या अभ्यासक्रमासाठी असलेले पात्रता निकष शिथील करण्याचा निर्णय आयुष मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार खुल्या, मागासवर्गीय आणि अपंग विद्यार्थ्यांचे 15 पर्सेंटाईल कमी केलेले आहे. त्यामुळे प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रवेशासाठी पात्र ठरणार्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी सेलकडून पुन्हा प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली आहे.
बीएएमएस, बीएचएमएस आणि बीयूएमएस अभ्यासक्रमासाठी नीट परीक्षा द्यावी लागते. परंतु नीट परीक्षा अवघड असल्याने त्यामध्ये उत्तीर्ण होणे सहज शक्य नाही. त्यामुळे पात्र ठरणार्यांची संख्या कमी आहे. अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी प्रवेश त्यामुळे घेता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन आयुष मंत्रालयातर्फे या जागा भरण्यासाठी पात्रता निकष शिथील करण्यात आले आहेत. यानुसार बीएएमएस, बीएचएमएस आणि बीयूएमएस अभ्यासक्रमासाठी खुल्या गटातील पर्सेंटाईल 50 वरून 35 केले. तर, अपंगासाठी 45 वरून 30 आणि मागासवर्गींयांसाठी 40 वरून 25 इतके कमी केले आहे.
त्यामुळे नीट परीक्षा उत्तीर्ण होऊनही प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. नव्याने होणार्या प्रवेश परीक्षेसाठी सीईटीसाठी नोंदणी न केलेले पण नीट यूजी 2018 साठी पात्र ठरलेले विद्यार्थी, नोंदणी करूनही कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश न घेतलेले विद्यार्थी यासाठी पात्र ठरणार आहेत. नव्याने होणार्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून, यामध्ये निवड होणार्या विद्यार्थ्यांची यादी वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येणार आहे.